मंगळवार, ८ जुलै, २०२५

अडगळीतील समृद्धी लेख क्र. ११

 काठवट

           सकाळी झाड- लोट आणि अंघोळ आवरली की आई स्वयपाकाला लागायची. आधी चूल पेटवली जायची. मग पिठाचा डबा जवळ घेऊन आई भाकरीची तयारी करायची. प्रथम चुलीवर तवा ठेवून ती डब्यातलं पीठ चाळणीत घायची. काठवटीत ते हळुवारपणे चाळायची. नंतर काठवटीतील पिठात ओंजळीने गरजेपूरतं पाणी घेऊन ती पीठ मळायची. आईचं पीठ मळणं म्हणजे तिच्या दोन तळहातांनी पिठात जीव ओतनंचं असायचं. हे मळणं म्हणजे भाकरीवरचा प्रथम संस्कारच असायचा. आपल्या हातांनी जणू काही पिठामध्ये प्राण यावा अशीचं ती कसरत असायची. पिठात पाणी मिसळून त्याचा एकजीव उंडा होईपर्यंत तिची मेहनत चालायची. काठवटीत पीठ आणि पाणी एकजीव होताना पाहणं हा एक दिव्य अनुभव असतो. मी हा अनुभव अनेकदा घेतलाय.        

              भाकरीला बसण्याची आईची विशिष्ट पद्धत असे. दोन्ही पायाचे अंगठे काठावटीच्या दोन्ही कानावर अलगदपणे ठेऊन आई पीठ मळायला बसायची. काठवटीतील पिठात पाणी टाकून ती प्रथम एका हाताच्या बोटांनी त्याचं मिश्रण करायची. मग पीठ थोडं घट्ट झालं की ती एका तळहाताने पिठाचा गोळा धरून त्याला जोराचा हिसका देऊन तो काठवटीच्या तळावर घसरायची. पुन्हा तो गोळा काठवटीत गोल फिरवत तळातलं उरलेलं पीठ त्यात मिसळून त्या गोळ्याला एक दोन वेळा काठवटीतचं आपटायची. जोपर्यंत पीठ एकजीव होत नाही तोपर्यत ती असं करत असे. एकदाका पिठाचा उंडा मनाजोगा झाला की मग त्या उंड्याला दोन्हा हातांनी विशिष्टरित्या चाळवून त्याला हातातचं गोल आकार देत असे. नंतर काठावटीच्या तळात चाळणीने थोडे पीठ पसरून ती भाकरी थापत असे. काठवटीच्या तळाच्या आकाराची ती गोल भाकरी मग तव्यावर जात असे. या कामात आईच्या मेहनतीबरोबरचं काठवटीची देखील महत्त्वाची भूमिका असे. मळणे, उंडा करणे व थापणे हे भाकरीवरील संस्कार केवळ काठवटीमुळेच उत्तमपणे साधले जायचे.  

            थोडीशी लंबगोल, खोलगट आणि दोन बाजुला कान असलेली ही लाकडी काठवट माझ्या लहानपनापासून मी पहात आलो आहे. गेली तीन पिढ्या ही काठवट आमच्या घरी आहे. माझी आजी सांगायची की भिंगारला असताना तिच्या सासूने ही काठवट घेतली होती. काठवट म्हणजे काष्ट + वाटी वा पात्र किंवा लाकडी परात होय. काठ असलेलं पीठ मळायचं लाकडी भांड म्हणजे काठवट असाही एक अर्थ घेतला जातो. साधारणपणे लांबट गोल, थोडे खोलगट आणि दोन्ही बाजूला कान अशी रचना म्हणजे काठवट. लाकडाच्या एका गोलाकार ओंडक्याला कोरुन परातीच्या आकाराचं हे भांड बनवलं जातं. काही काठवटींच्या वरच्या दर्शनी भागावर नक्षीकाम देखील केलेलं असते. तर काही काठवटींचे कान नक्षीदार व आकर्षक असतात. काठवट बनवणं हे अस्सल कलाकाराचं कामं असतं. काठवट हे स्वयंपाक घरातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि मौल्यवान साधन आहे. भारतातीय परंपरेत या पारंपरिक साधनास वैभवशाली इतिहास आहे. 

            प्राचीन काळात अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्वयंपाक घरातच नव्हे तर घराच्या अंगणात पारंपरिक पद्धतीने केली जात असे. त्या काळात दगडी उखळ-मुसळ, मातीची भांडी यांसोबत लाकडी पट्टी अथवा गुळगुळीत दगडाची पाटी यांचा उपयोग पीठ मळण्यासाठी होत होता. असे एक सपाट, मजबूत पृष्ठभाग असलेले साधन म्हणजेच काठवटीचे पूर्वरूप असावे. मौर्य - गुप्तकाळात काठवटीचे स्वरूप अधिक विकसित झाले. एक प्रकारचे लाकडी साधन ज्यात पीठ सांडू नये म्हणून थोडी कड असलेली योजना करण्यात आली.  पुढे मध्ययुगात लाकडी काठवटीला मूळ रुप मिळाले. त्यामुळे त्यामध्ये एकत्रितपणे पीठ मळणं अधिक सुटसुटीत आणि सोपं व्हायला लागलं. ब्रिटिशांच्या आगमनानंतर आधुनिक वस्तू बाजारात येऊ लागल्या. परंतु ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये पारंपरिक काठवटीचाच वापर सुरू होता. ज्या प्रदेशात ज्वारी व बाजरीचे उत्पन्न अधिक त्या प्रदेशात काठवट वापरली जात असे. 

            स्वातंत्र्योत्तर काळात स्वयंपाक घरात आधुनिक उपकरणांची भर पडली, परंतु तरीही गावाकडे काही प्रमाणात काठवटीचे स्थान टिकून राहिले होते. विसाव्या शतकाच्या अखेरच्या काही दशकात प्लास्टिक व स्टीलची भांडी स्वयंपाक घरात वापरली जाऊ लागली.  याचं काळात आधुनिक घराचीही निर्मिती होऊ लागली. यामध्ये स्वयंपाकघर म्हणजेच आजच्या किचनची योजना झाली. यामध्ये किचन ओटा तयार करण्यात आला. यामुळे स्वयंपाकाची पारंपरिक पद्धतच निकालात निघाली. ओट्याशेजारी उभा राहून स्वयंपाक केला जाऊ लागला. 

           याच काळात नोकरी, व्यवसाय तथा उद्योग धंद्यामुळे जीवन व्यवहाराला गती मिळाली. अधिक उत्पन्न आणि सहज उपलब्धतेमुळे गहू व तांदूळ या अन्नधान्यांचे आहारात प्रमाण वाढू लागले. त्यामुळे स्वयंपाकात भाकरीपेक्षा चपाती व भाताचे प्रमाण वाढले. यातच काठवटीला पर्याय म्हणून बाजारात स्टीलची मोठी ताटं आली आणि काठवट स्वयंपाक घरातून हद्दपार झाली. काळाच्या ओघात काठवट दुर्मिळ झाली आहे. सहसा खेड्यामध्ये काही लोकांकडे ती आहे; पण तीही तुटलेल्या अवस्थेत आणि अडगळीच्या खोलीत. 

            आज अनेक घरात काठवट पहायलाच मिळत नाही. आणि असली तरी तिचा वापर होत नाही. काठवट हे आहाराला स्वादिष्ठता व सात्विकता प्राप्त करून देणारं पारंपरिक साधन आहे. आई, आजी आणि पणजीच्या सुगरणपणात अनोखी चव भरणारं हे साधन आज नामशेष होण्याच्या मार्गांवर आहे. काठवटीत केवळ पीठ मळलं जातं नसे; तर तिच्यात कौटुंबिक आहार आणि शरीरस्वास्थ तथा आरोग्याचे पिंडं मळले जात असत. काठवट ही पिढ्यांपिढ्याच्या संस्काराची शिदोरी आहे. तिला पारंपरिक पाककलेची साक्षीदार समजली जाते. पारंपरिक लाकडी काठवटीला आजही संस्कार, शिस्त आणि मातृत्वाची प्रतिकात्मक महती आहे.

            कोणती स्त्री काठवटीत चांगलं पीठ मळते, यावरून तिच्या स्वयंपाक कौशल्याचं मूल्यमापन केलं जात असे. काठवटीवर आईने मळलेले पीठ, थापलेली भाकरी आणि तव्यावरून सुटणारा सुवास ही आठवण प्रत्येक ग्रामीण भारतीयाच्या मनात आजही दरवळत आहे. ‘काठवट’ हे फक्त एक स्वयंपाकी साधन नसून ते आपल्या संस्कृतीचं वैभव, स्त्रीच्या कलेचा नि श्रमाचा पुरावा आणि कुटुंबाच्या पोषणाचा आधार असते. काळानुसार तिचे उपयोग, रचना आणि साहित्य बदलले असले तरी आजही तिचे अस्तित्व टिकून राहणे गरजेचे आहे. 

             आई, आजीच्या हातून मळलेलं पीठ, काठवटीवर थापलेली भाकरी आणि ते चविष्ट जगणं आज फार दूर होत चाललंय. आज स्वयंपाक घरात स्टीलच्या परातीत भाकरी मळली जाते पण तिच्यात काठवटीवर मळलेल्या पिठातली ओल, तो स्वाद आणि आपुलकीचा वास कुठेच जाणवत नाही. म्हणूनच कित्येक पिढ्यांच्या स्वयंपाक कलेचा आणि कला संस्काराचा हा अमूल्य वारसा आपण जपायला हवा. स्वयंपाक घराचा ‘वट‘ आणि ’रुबाब‘ सांभाळण्याचं नेमकं काम करणारी काठवट आज निस्तेज होऊन पडली आहे. अडगळीत पडलेल्या गृहकला संस्कृतीच्या या साक्षीदाराचा स्वादिष्ट नाद पुन्हा स्वयंपाक घरात घुमायला हवा. आपल्या माईच्या मायेच्या हातातलं हे कणखर चैतन्य आपण टिकवून ठेवायलाचं हवं. एवढीच अपेक्षा ! 


✍️ प्रा. डॉ. अशोक नामदेव शिंदे 

      मराठी विभाग,

      मुधोजी महाविद्यालय, फलटण