शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०२५

पोहरा - अडगळीतील समृद्धी लेख - 12

              पोहरा 

           दिवस उगवायच्या वेळेला गावच्या सरकारी आडावर महिलांचा एकच गलका उठायचा. पाणी भरण्यासाठी त्यांची जणू झुंबडचं उडायची. सरकारी आड आमच्या गावच्या नागनाथ मंदिराच्या पूर्वेला होता. गोल आकाराचा हा आड आतल्या पक्क्या खडकापासून ते वर जमिनीपासून दोन अडीच फूटापर्यँत चौकोनी चिऱ्यांनी बांधलेला होता. त्याचा शेवटचा म्हणजेच वरचा थर अर्धगोलाकार घडीव तोडीचा होता. वाऱ्या वादळात धूळ किंवा कचरा आडात पडू नये म्हणून अशा चौथरा किंवा कट्याची बांधणी केली जात असावी. तसेच मोकाट जनावरं आणि लहान मुलांचे संरक्षण व्हावे म्हणूनही अशी व्यवस्था केलेली असावी. आडाच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूला दोन  रहाट बसवलेले होते. रहाटासाठी दोन्ही बाजूला वावभर रुंद जागा सोडलेली होती. तेथे जमिनीलगत एक आडवी व दोन उभ्या लांब दगडी तोंडी बसवलेल्या होत्या. उभ्या दोन तोडींच्या तोंडाला प्रत्येकी एक भोक पाडलेले होते. यामध्ये रहाटाचे उभे दोन लोखंडी खांब बसवलेले होते. या दोन खांबांच्या वरच्या टोकातून एक आरपार लोखंडी पाईप बसवलेला होता. त्या पाईपच्या मधोमध एक लोखंडी चाक किंवा कप्पी बसवलेली होती. असे हे राहाट दोन्ही बाजूला होते.

            खरं तर आमच्या गावात दोन - तीन आड होते. मात्र रहाट असलेला आणि सभोवती मोकळी जागा असलेला हा एकमेव सरकारी आड होता. हा आड तसा खूप खोल नव्हता. साधारण दोन- तीन परस खोली असलेला हा आड जवळून गावनदी वाहत असल्यामुळे वर्षभर गावाला पाणी पुरवायचा. उन्हाळ्यात मात्र याचं पाणी बरच खाली जायचं. कधी कधी आडाचा तळही दिसायचा. मात्र गावाला पुरेल एवढं पाणी या आडात हमखास असायचं. त्यामुळे या अडावर पाणी भरणारांची सतत वर्दळ असे. म्हणूनच डोक्यावर हंडा, त्यावर कळशी आणि हातात पोहरा घेऊन गावातील बायकांची या आडावर पाणी भरण्याची लगभग सुरु असायची. त्यांच्या एकमिकींशी बोलण्यामुळे एकच कालवा होत असे. या आडावर पाणी शेंदण्यासाठी एका मागोमाग एक असे महिलांचे नंबर लागलेले असत. काही वेळेला देवाला पाणी घालायला आलेली भाविक मंडळी देखील या आडावर आपला गडवा भरून घ्यायला यायची. रहाटामुळे पाणी खोल असले तरी शेंदण्यास कमी कष्ट पडत असे. त्यामुळे अगदी आनंदाने एखादी महिला आपला पोहरा भाविकांच्या भांड्यात ओतत असे. पोहरा हे त्याकाळी आडातून किंवा विहिरीतून पाणी शेंदण्याचे एक प्रमुख साधन होते. त्याकाळी प्रत्येक घरी पोहरा हमखास असायचाचं 

            पोहरा म्हणजे लाकडी किंवा धातूच्या पत्र्यांपासून बनवलेला एक शंकूच्या आकाराचे साधन होय. लोखंड किंवा लाकडाला उभट लंबगोल आकार देऊन पोहरा बनवला जात असे. त्याला वरच्या बाजूला समोरासमोर दोन कान बसवलेले असत. त्यातून एक लोखंडी गजाची कडी ओऊन बसवलेली असे. त्या कडीला दोर बांधून रहाटाच्या कप्पीतून पोहरा आडात सोडला जायचा. लोखंडी पोहरा वजनदार असल्याने लगेच पाण्यात बुडायचा. पोहरा लाकडी किंवा बांबूच्या असेल तर मात्र त्याच्या कानाला काही वजनदार वस्तू बांधाव्या लागायच्या. कधी हातातील दोर विशिष्ट रीतीने हलवूनही पोहरा भरला जात असे. आडातील पोहरा पाण्याने पूर्ण भरला की मग कप्पीवरून दोर हळूहळू वर ओढीत पाणी शेंदले जायचे. पोहरा खालून वर रहाटाच्या मधोमध आला की मग एका हाताने दोर घट्ट पकडून दुसऱ्या हाताने पाण्याने भरलेला पोहरा बाहेरच्या बाजूला ओढला जायचा. अशा रीतीने आडातील पाणी पोहऱ्याने शेंदले जायचे. 

           आडातून किंवा विहिरीतून पिण्यासाठी पाणी शेंदण्याची ही पारंपरिक पद्धत होती. आडातील पाणी शेंदण्यासाठी लोखंडी रहाट तयार केले जायचे. ते खूप  भक्कम असायचे. काही आडावर लाकडी राहाट देखील बसवलेले असायचे. ते लाकडी रहाट सुद्धा अतिशय भक्कम असायचे. या रहाटाद्वारे पाणी शेंदण्यासाठी पोहरा हे साधन वापरले जात असे. मानवी संस्कृतीत या साधनाचे मोलाचे योगदान आहे. प्राचीन काळापासून पाणी शेंदण्यासाठी पोहरा हे साधन वापरले जात होते.

           पोहरा हे भारतातील पारंपरिक पाणी शेंदण्याचे साधन असून प्राचीन काळापासून त्याचा वापर आड, विहिरीमधून पाणी शेंदण्यासाठी केला जात आहे. वैदिक काळात ऋग्वेद व अथर्ववेदात विहिरींचा आणि जलसाठ्यांचा उल्लेख सापडतो. त्याकाळी ‘पोहरा’ या साधनासारखे पाणी  काढणारे साधन हे लाकडाच्या किंवा मातीच्या साह्याने बनवले जात होते. या काळात त्याचा उपयोग यज्ञासाठी पवित्र जल काढणे अथवा झाडांसाठी पाणी देण्यासाठी होई.  महाजनपद व मौर्य काळात विहिरी व आड अधिक प्रमाणात खणले गेले. या काळात काठावर लाकडी किंवा धातूचे पिंप (पोहरा) टांगलेले असायचे, जे दोरीने खाली जाई व वर पाणी घेऊन यायचे. याकाळी स्त्रिया घरातील पाणी वापरासाठी असा पोहरा वापरत होत्या. 

गुप्त व उत्तर गुप्त काळात जलसंवर्धनाची पद्धती अधिक विकसित झाली. विहिरी भोवती चौथरा आणि त्यावर पोहरा ठेवायचे यंत्र (कधी कधी हाताने फिरवले जाणारे चक्र) लावले जाई. याकाळात लोखंडी हुक, दोर व मातीचा मोठा घडा म्हणजेच पोहरा याचा वापर वाढला.

           मध्ययुगीन काळात दाट वस्तीतील गावांमध्ये पोहरा अत्यावश्यक झालेला होता. या काळात स्त्रिया विहिर वा अडातून पोहरा वापरून पाणी काढून ‘घागरी’मध्ये भरत असत.

पेशवाई काळात लोखंडी पोहरा वापरात होता.

स्वातंत्र्योत्तर काळात हातपंप, मोटारपंप, नळयोजना आल्याने पोहऱ्याचा वापर हळूहळू घटू लागला. मात्र अजूनही काही ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी पारंपरिक पाणवठ्यांवर पोहऱ्याचा वापर सुरू आहे. या ठिकाणी पितळ, स्टील, प्लास्टिकच्या बादल्यांचा वापर पोहरा म्हणून केला जातो. मात्र जो पारंपरिक लोखंडी किंवा लाकडी पोहरा होता तो आज शक्यतो पाहायला मिळत नाही आणि उपयोगातही येताना दिसत नाही.

           पोहरा हा केवळ पाणी शेंदण्याचे पारंपरिक साधन नव्हता तर तो भारतीय ग्रामीण 

संस्कृतीचा सामाजिक व सांस्कृतिक वारसा होता. श्रमसंस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण आधार होता.  त्याद्वारे आड वा विहिरीतील खोल पाणी काढण्याचे कष्टप्राय काम अगदी कमी कष्टात आणि सहजपणे होत असे. मानवी संस्कृतीच्या विकासात व प्रवासात नदी, नाला, ओढा, आड, विहीर या जलस्त्रोताचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. विशेषत: स्त्री जगताचे आणि या जलस्त्रोतांचे एक भावनिक व जिव्हाळ्याचे नाते आहे. स्वयपाक, कपडे, भांडी याकामासाठी पाणी महत्वाचे असते. पाणी आणण्याचे हे  

काम पूर्वांपार स्त्रियाचं करत आल्या आहेत. आजही हे काम स्त्रियाचं करत आहेत. त्यामुळे या कामाशी संबंधित घटकांची त्यांचे एक नाते निर्माण झालेले असते. पोहरा हे त्यापैकीच एक साधन आहे. 

            पोहऱ्याने पाणी काढणं म्हणजे केवळ एक श्रमिक क्रिया नव्हती, तर ती एक परंपरा होती. एक नित्यनेमाची पूजा. प्रत्येक पहाटेला, गावातल्या बायकांचा गजर सुरू व्हायचा. कुणाच्या डोक्यावर तांब्याची घागर, कुणाच्या हातात पोहरा, तर कुणाच्या ओठांवर गाणं. घागर, हंडा, कळशी आणि पोहरा या वस्तूंशी स्त्रीचे भावविश्व जोडले असे गेलेले असायचे. आडापासून ओसरीपर्यंतचं अंतर म्हणजे स्त्रीचा एक नियमित प्रवास असायचा. हा प्रवास कधी प्रेमाचा, कधी हक्काचा, कधी दुःखाचा असायचा. या सर्व प्रसंगाचा सच्चा साक्षीदार म्हणजे तिच्या हातातील हा पोहरा असायचा. पोहरा हे केवळ आडातील पाणी शेंदण्याचे साधन नव्हते, तर स्त्रीच्या मनातील भावनांची उकल करणारे माध्यम होते. आडातील खोल पाण्याबरोबरच तिच्या मनातील खोल सलही यनिमित्ताने वर यायची. पाणी आणण्याच्या निमित्ताने स्त्रियांचे एकमेककींशी मैत्रीचे नाते जुळून यायचे. पोहऱ्यामुळे कष्ट तर कमी व्हायचेच;  शिवाय मैत्रिणींशी जोडीदारच्या, संसाराच्या, सुख दुःखाच्या गप्पाही व्ह्यायच्या. या गप्पातून मनातील दुःख भरून यायचे आणि  संसाराचे धागे अधिक घट्ट होत जायचे. 

             कधी कधी आडावर एकच पोहरा असायचा. त्यावेळी सगळ्याजनी आळी पाळीने पोहरा वापरत असतं. स्त्रियांच्या बरोबर कधी पुरुष मंडळींदेखील पाणी भरण्यासाठी आडावर येत असत. कधी दोर तूटून किंवा हातातून दोर निसटून पोहरा आडात पडायचा. अशावेळी पोहणारा कोणीतरी तळाला जाऊन तो पोहरा वर काढायचा. तर कधी याकामी अनेक हुकं एकत्रित करून त्या हुकांचा जुडगा म्हणजेच गळ आडात टाकूनही बुडालेला तो पोहरा काढला जात असे. हा गळ गावातील कोणा एकदोन जणांकडेच असत. अशावेळी त्याची खूप मदत होतं असे. त्याचा मेहनताना म्हणून त्याला प्रेमाने आणि आग्रहाणे काहीतरी वस्तू भेट देण्याची प्रथाही अनेक गावांमध्ये होती. असा पोहरा हा ग्रामीण लोकजीवनाची अगदी घट्ट जोडला गेलेला होता. या निमित्ताने सामाजिक सौख्य व सहकार्यवृत्तीचेही दर्शन घडायचे. 

            विहिरीवर पोहरा घेऊन येणाऱ्या स्त्रिया ही ग्रामीण संस्कृतीची आज एक चित्रमय आठवण वाटतेय. ‘पोहरा’ हा भारतीय ग्रामीण जीवनशैलीचा भाग होता. या पारंपरिक साधनाने इतिहास, संस्कृती, स्त्रीजीवन आणि जलव्यवस्थापन यांना एकत्र गुंफून ठेवलेले होते. आई, आजी, सासू अशा घरातील कित्येक स्त्रियांचे भावविश्व या पोहऱ्याशी जोडलेले असायचे. म्हणूनच पोहरा हे स्त्रीचे श्रम आणि भावना यांचा खरा साक्षीदार होता. आज ग्रामीण संस्कृती पूर्णत: बदलली आहे. नदी, ओढा, विहीर, आड हे पारंपरिक जलस्रोत आता घरकामासाठी वापरले जात नाहीत. नदी, ओढे आता पूर्वी सारखी वाहतच नाहीत आणि विहिरी व आडही आता आटून गेलेले दिसतात. आड तर केवळ अवशेषरूपी उरलेले दिसतात. काही गावातील आणि वाड्यातील आड तर गाडून टाकलेले आहे. त्या बरोबरच त्याच्या संबंधीच्या हजारो आठवणी व भावनाच गाडल्या गेल्या आहेत. पारंपरिक जलस्रोत मिटले, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित वस्तूही हळूहळू लोप पावत चालल्या आहेत. 

              आज शहराबरोबरच गावखेड्यातही आधुनिक स्वरूपाचे राहणीमान दिसत आहे. अनेकांच्या अंगणात आज कूपनलिका आहेत. गावात हातपंप आणि आणि नळ योजना आल्या आहेत. औद्यागिक क्रांतीमुळे सिमेंट व प्लॅस्टिकच्या वा रबरी पाईपच्या आधुनिक जलवाहिन्या निर्माण झाल्या आहेत. पाणी पुरवठ्याच्या शासकीय योजनांबरोबरच काहीजन आपल्या घरी वैयक्तिक पाणी पुरवठ्याची व्यवस्था करत आहेत. यासाठी लागणारे तंत्र, यंत्र आणि आर्थिक कुवत यांची सहज उपलब्धता आहे. आज स्वयंपाक घरात व न्हाणीघरात हवे तितके व हवे तसे पाणी उपलब्ध होत आहे. या आधुनिक जीवनशैलीमुळे पाणी पुरवठ्याची सर्व पारंपारिक साधनेच आज अडगळीत पडलेली आहेत. 

          घागर, हंडा, कळशी ही साधने आज घरात किमान पाणी साठविण्यासाठी तरी कधी कधी वापरली जातात. मात्र पोहरा आज कुठेच दिसत नाही. एक साधन वापरातून बाजूला झालं कीं,  त्याबरोबर त्याच्याशी संबंधित संस्कृतीही लोप पावते. आज पोहरा दिसत नाही. त्याबरोबरच आड, रहाट, कप्पी दिसेनाशी झाली आहेत. आणि आडात पडलेल्या पोहऱ्याला शोधून काढणारा गळ तर स्वतःच हरवलेला आहे. पोहरा नाही त्यामुळं संवाद मुका झाला आहे. अंगणातील हौद आणि छतावरील टाकी तील पाण्यात स्त्रीच्या भावना साठून आटून जात आहेत.

          काळानुसार नवंनिर्माण, नवं संस्कृतीचा स्वीकार अनिवार्यचं आहे. मात्र मानवी ग्राम संस्कृतीचे वैभवशाली साक्षीदार आसलेल्या साधनाचे जतन करणे हेही आपले कर्तव्य आहे. श्रमसन्मानाचा व भावनिकतेचचा वारसा असणारा पोहरा पुन्हा वापरता येईल कां नाही हे सांगता येणार नाही. मात्र आज तो जिथं आहे आणि जसा आहे , तसा तिथं आणि तसाच जपला जायला हवा. किमान पुढील पिढ्यांना हा पिढ्यांपिढ्याचा वैभवशाली वारसा वस्तू रूपाने कां होईना पाहता येईल. आज अडगळीतील पोहरा किती मोलाचा आणि मूल्याचा आहे हे निश्चित सांगता येणार नाही परंतु; तो ज्याच्याकडे आहे त्याची श्रीमंती मात्र कोणालाच मोजता येणारं नाही एवढं खरं. म्हणूनच स्त्रीजीवनाचा श्रमाचा आणि प्रेमाचा हा मौलिक साक्षीदार असलेला पोहरा आपण जपायलाच हवा! 


डॉ. अशोक शिंदे

प्राध्यापक, मराठी विभाग

मुधोजी महाविद्यालय, फलटण. 

मोबाईल - ९८६०८५०३४४