गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

अडगळीतील समृद्धी- लेख क्र. १४

 अडकित्ता

           रात्रीची जेवणं आटोपली की ओसरीत आजोबांचा एक छोटासा मुखशुद्धीचा कार्यक्रम सुरु व्हायचा. ओसरीतल्या देवळीत आजोबांचा एक चौकोनी डबा असे. आजोबा त्याला पानपुडा म्हणायचे. हा पानपुडा घेऊन ते ओसरीत बैठक मारत असत. कधी सतरंजी अंथरून तर कधी बाजेवर बसून आजोबांचा हा कार्यक्रम चांगलाच रंगायचा. पांढरे शुभ्र धोतर नेसलेले आजोबा मांडी घालून बसायचे. आजोबांची मांडी म्हणजे घरातल्या सर्व लहानग्यांची हक्काची जागा. मात्र या जागेवर पहिला अधिकार असायचा तो सगळ्यात धाकट्याचा. पण यावेळी आजोबांच्या मांडीवर मात्र कोणीही बसायचे नाही.

           सगळे जण आजोबांच्या पुढे अर्धगोलाकार बसायचे. प्रत्येकाची जागा ठरलेलीच असायची. ज्याने त्याने आपापली जागा घेतली की मग आजोबांच्या कार्यक्रमाला सुरुवात व्हायची. आजोबांचा पानपुडा म्हणजे एक आखीव, रेखीव , कोरीव व जाळीदार नक्षी असलेली सुंदर पेटी होती. आजोबांच्या या पानपुड्यात अनेक पदार्थ आणि वस्तू असायच्या. ही पेटी म्हणजे लहानग्यांसाठी अलीबाबाची गुहाच असायची. आजोबा या पेटीतून एक एक रत्न काढावे तशी एकेक वस्तू बाहेर काढायचे. सर्व जण अगदी कुतूहलाने या वस्तूंकडे बघत असत. 

           सर्वप्रथम आजोबा हिरवी दोन पानं बाहेर काढायचे. ती पाने वाटीतल्या पाण्याने धुवून घ्यायचे. मग त्यांच्या देठांना चिमटीत धरून त्यातील पाणी शिपडायचे. नंतर एक एक करत ती पाने आपल्या उजव्या मांडीवर चोळायचे आणि पुसून घ्यायचे. मग एकाखाली एक जुळवून पानांचे दोन्ही देठ बोटांनी हळूच खुडायचे व ते देठ दाताखाली दाबून ठेवायचे. नंतर आजोबा पानपुड्यातून छोटीशी नाजूक कात्री काढायचे. ही कात्री म्हणजे लहानग्यांचे भारी आकर्षण पण तिला कोणीही हात लावायचा नाही अशी आजोबांची तंबी असायची. या नाजूक कात्रीने आजोबा पानाचा काही खराब भाग कापायचे. दोन्ही पानांचे आकार एकसमान करायचे आणि ती पाने उजव्या मांडीवर ठेवायचे.

           त्यांनतर आजोबा पेटीतून चुन्याची नाजूक डबी काढायचे. उजव्या अनामिकेच्या नखाच्या वरच्या बाजूने त्यातील चुना काढायचे आणि वरच्या पानावर लावायचे.  मग आजोबा एक छोटीशी पांढरी सुती पिशवी बाहेर काढायचे. तिचे तोंड एका बंदाने गाठ मारून बंद केलेले असायचे. आजोबा हळूच तो बंद ओढायचे. तोंड उघडले की त्यातून एक छोटासा लालसर काताचा खडा बाहेर काढायचे. त्याची भुकटी करून ते चुन्यावर टाकायचे. त्यानंतर आजोबा एक सुपारी बाहेर काढायचे. 

            सुपारी बाहेर काढली की आतापर्यंत अगदी शांतपणे बसलेले सर्वजण आणखी सुदरून बसायचे. आता त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असायची. कारण ज्या क्षणाची ते आतुरतेने वाट पाहत असायचे तो सुपारी कातरण्याचा क्षण समीप आलेला असायचा. आजोबा सुपारी बाहेर काढायचे. तिच्यावर जोराची फूक मारून ती स्वच्छ करायचे. नंतर ते पेटीतून एक अत्यंत देखणी वस्तू बाहेर काढायचे. ती वस्तू म्हणजे अडकित्ता. सुपारी कातरण्याचे हे हत्यार. त्याचा आकार आणि त्याचं कार्य या दोन्हीही गोष्टी अगदीच कुतूहलाच्या असायच्या. हा अडकित्ताच लहानग्यांचे खास आकर्षण असायचा.     

           आजोबांचा हा अडकित्ता साधारण अर्धा फूट लांबीच्या दोन पोलादी दांड्यांनी जोडलेला होता. वरच्या दांडीला निम्म्यापर्यंत एक धारदार पाते व बाकी निम्मा भाग गोल आकाराचा दांडा होता. खालची बाजू निम्यापर्यंत थोडीशी सपाट तर बाकी निम्मा भाग गोल दांडा अशी होती. आजोबा उजव्या हातात हा अडकित्ता घ्यायचे. याची खालची दांडी हाताच्या चार बोटावर व वरची दांडी अंगठ्याखाली येईल अशा रीतीने ते आडकित्ता हातात धरायचे. मग डाव्या हाताचा अंगठा व शेजारच्या दोन बोटांच्या चिमटीत ते सुपारी धरायचे. सुपारी कातरताना आजोबा आडकित्त्याच्या दोन्ही दांड्यांच्या मध्ये सुपारी धरायचे आणि अशा रीतीने तो चालवायचे की सुपारीचे अगदी पातळ पदर खालच्या हाताच्या बोटाच्या चिमटीत जमा व्हायचे. मुलांना याचीच मोठी गंमत वाटायची. आजोबांचा हा अडकित्ता आणि त्यांचे सुपारी कातरणे या दोन्ही गोष्टी लहानग्यांना खूपच आवडत असत. 

           कातरलेल्या सुपारीचे दोन तीन पातळ पापुडे आजोबा पानावर ठेवत आणि त्या पानांची त्रिकोणी घडी घालून ते पान खात असत. यावेळी आजोबा घरातील काही मंडळींनाही अशा पानाचे विडे बनवून देत असत. याचा लाभ काही लहान्यांनाही मिळायचा. पण यावेळी ते लहान मुलांना पान खाण्याबाबतचे नियम व अटीही सांगत असत. मात्र पान खाण्यापेक्षा आजोबांचा अडकित्ता व त्याने कातरली जाणारी सुपारी हे पाहण्यासाठीच घरातील ही लहान मंडळी रोज रात्री आजोबांजवळ येऊन बसत असत. ते जसे अडकित्ता हातात घेऊन सुपारी कातरतात तसाच प्रयत्न ही मंडळी करत असत. अडकित्ता हे पानपुड्यातील सर्वात महत्त्वाचे आणि लहान मुलांच्या आवडीचे साधन होते. अडकित्त्याशिवाय पानपुड्याला व पानविड्याला शोभा नसायची. म्हणूनच प्रत्येक घरात हे साधन असायचेच. 

           अडकित्ता हे दुहेरी तरफेच्या तंत्राचे एक हत्यार असते. सुपारी कातरणे आणि तिचे तुकडे करणे यासाठी ते वापरले जाते. मूळ ‘अडकोत्तू’ या कानडी शब्दाचे अडकित्ता हे मराठी रूप असावे. अडकित्त्याची निर्मिती लोकसंस्कृतीतील इतर उपयुक्त साधनांप्रमाणेच मानवी गरजेतून झाली आहे.  या साधनास सौंदर्याची जोड देण्याच्या प्रयत्नातून त्यावरील नक्षीकाम व त्याचे विविध आकार निर्माण झाले आहेत. काही अडकित्त्याच्या सपाट भागावर सोन्याचांदीचा मुलामा चढवून वेलबुट्या व नक्षी कोरलेल्या असतात. काहींवर आरसे, रंगीबेरंगी काचांचे तुकडे बसविलेले असतात, तर काही अडकित्त्यांना घुंगरेही जोडलेली असतात. तसेच काही अडकित्त्यांचा आकार देवदेवता व पशुपक्ष्यांप्रमाणे असतो. काही खानदानी घरातील अडकित्त्यात सोने, चांदी, पितळ, ब्राँझ इत्यादींचा मौल्यवान धातूंचाही वापर करण्यात आलेला दिसतो. भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या काळांत विविध प्रकारांचे असे अडकित्ते दिसून येतात.

           अडकित्ता हे साधन भारतीय पारंपारिक आहार संस्कृतीशी संबंधित एक प्रमुख साधन मानले जाते. हे भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचे साधन आहे. ते केवळ घरगुती उपयोगापुरते मर्यादित नसून लोकजीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात ते खोलवर रुजलेले साधन आहे. प्राचीन काळात लोखंडाची साधने कमी प्रमाणात वापरले जात होती.  याकाळात सुपारी फोडण्यासाठी साधे लोखंडी किंवा तांब्याची धारदार पाती असलेली हत्यारे अस्तित्वात होती. सातवाहन व नंतरच्या दक्षिण भारतीय राजवटींमध्ये पान–सुपारी संस्कृती अत्यंत महत्त्वाची मानली जाऊ लागली. या काळात साधे, दांड्या–फळीचे लोखंडी साधन वापरले जात असे. या काळात शिल्पकला व कौशल्यातून लहान आकाराचे कातरणारे अवजार तयार झाले हे अडकित्त्याचे पहिले रूप असावे. 

              पुढे यादव, बहामनी व मोगल काळापर्यंत पान–सुपारीला राजाश्रय मिळाला. तो एक प्रकारचा शिष्टाचार बनला. या काळात अडकित्ता कलात्मक व शोभेची वस्तू झाली होती. याच काळात पितळ, कांस्य, चांदी, हत्तीचे दात, हाड, आणि कधी कधी सोन्याच्या पत्र्याने मढवलेलेही अडकित्ते बनू लागले. तसेच अडकित्त्याच्या पातीवर हत्ती, मोर, वेली, नक्षीकाम होऊ लागले. या काळात श्रीमंत वा राजेशाही परिवारात अडकित्ते वापरले जात होते. ब्रिटिश राजवटीत ग्रामीण व शहरी भागात पान–सुपारी खाण्याची प्रथा रूढ झाली होती. या काळातच अडकित्ते घराघरात सर्वसामान्य झाले. याच काळात विविध आकार नक्षी काम असलेले अडकित्ते तयार झाले. 

               आधुनिक काळात मात्र शहरी जीवनशैलीत बदल होत गेले. आहारशैली व पदार्थही बदलले. विभक्त कुटुंबपद्धती मूळ रोऊ लागली. नोकरी व्यवसायामुळे जेवणाच्या वेळा बदलल्या गेल्या. घरातील एकत्र पंगती जेवण कमी झाले. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात आजी आजोबांचा वावर कमी होत गेला. अलीकडच्या काळात तर खाणावळी, उपहारगृहे, अतिथीगृहे, हॉटेल्स, रेस्टोरेंट यांची रेलचैल वाढली आहे. पाहुणे आल्यावर तर हमखास एखाद्या हॉटेलवर जेवणाचा बेत ठरवला जातो. तेथे पान स्टॉल असतेच. आता तर केवळ शहरातच नव्हे तर अगदी खेडोपाडी सुद्धा चौका चौकात पानाचे ठेले उभा राहिलेले दिसतात. आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे पानांचे प्रकारही प्रसिद्ध होत आहेत. शिवाय अशा पानांचे पार्सल देखील घरी आणण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे आज घरातून पान–सुपारी खाण्याची प्रथा हळूहळू कमी होत चालली आहे. 

             घरात पानपुडा आहे मात्र तो दिवाणखान्यातील काचेच्या कपाटाची शोभा व घराची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम करत आहे. आणि त्यातील अडकित्ता तर आहे की नाही ते दिसत सुद्धा नाही. एकेकाळी घराचे पारिवारिक सौख्य जोपासणारा हा अडकित्ता आज मात्र दिसेनासा झाला आहे. अडकित्ता केवळ कौटुंबिक भोजन संस्कृतीचा घटक नव्हता तर तो धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यातही महत्त्वाची भूमिका बजावत होता. आपल्या आतिथ्य परंपरेचा प्रतिक म्हणून या साधनास खूप मान दिला जात असे. 

            धार्मिक विधी, सणवार, किंवा कौटुंबिक विशेष कार्यासाठी उपस्थित पै-पाहुण्यांच्या मेजवानी नंतर मुखशुद्धीच्या पाना इतकाच पान खाण्याचा कार्यक्रम सुद्धा रंगायचा. पाहुण्यांच्या हातात सुपारी कापून देणे हा पाहुण्याचा सन्मान समजला जायचा. पाहुण्यांना पानविडा देताना अतिथ्यसेवेचे समाधान मिळत असे. तोंडातील पान रंगण्यावरूनही यावेळी खूप चेष्टा, मस्करी व्हायची. याप्रसंगी इतर वस्तूंपेक्षा आडकित्ता हाच खास आकर्षण आणि चर्चेचा विषय असायचा.

            अडकित्ता हा कला संस्कृतीचा मौलिक ठेवा आहे. नक्षीकलेची विविध रूपे यामध्ये आढळतात. कारागिराची कलाकुसर वा सर्जनशीलता यामध्ये शिगोशिग भरलेली असते.  घरातील प्रतिष्ठा तथा कुलीनतेचे प्रतिक म्हणूनही अडकित्ता रुबाबात मिरवत असे. राजेशाही काळात तर राणीच्या महालात पानपुड्याचा मोठा थाट असे. त्यातील अडकित्ता सर्वात सुंदर रूपात असायचा. घरातील प्रतिष्ठेच्या वस्तूंमध्ये सर्वात रुबाब असायचा तो या अडकित्त्याचाच. जसा अडकित्त्याचा रुबाब असायचा तसाच तो अडकित्ता चालणाऱ्याचा सुद्धा असायचा. अडकित्त्याने सुपारी कातरणे हे एक कौशल्यच असायचे. यामध्ये घरातील वा गावातील ठराविकच लोक असतात. आमच्या गावचे साळीकराम तात्या सुपारी कातरण्यामध्ये अत्यंत प्रवीण होते. एक अख्खी सुपारी ते एकसलग एकाच वेळी कापून समोरच्यांच्या हातात ठेवत असे. गावात काही लोक तर असे असतात की ते भेट होताच सुपारी कातरून हातात ठेवतात आणि भेटीचा आनंद घेतात. 

            आदरातिथ्य आणि कौटुंबिक, सामाजिक सन्मान आणि समाधानाचे प्रतिक असणारा हा अडकित्ता सुपारी कातरण्याशिवाय इतर कामातही उपयोगी पडत असे. धान्याच्या पोत्याला शिवलेली सुतळी, चपलेची निसटलेली वादी आणि जनावरांच्या दाव्याची न सुटणारी गाठ कापण्यासाठी ऐनवेळी हा अडकित्ताच धावून येत असे. जनावरांचा चारा कातरणे तसेच उन्हाळ्यात लोणच्याच्या कैऱ्या फोडणे यासाठी जे अडकित्ते वापरले जायचे ते या अडकित्त्याचे थोरले भाऊबंदच होत. एकूणच कौशल्ययुक्त कापकामासाठी ग्रामीण संस्कृतीत अडकित्त्याचे स्थान खूप महत्त्वपूर्ण होते. 

           सद्या बदलत्या काळचा परिणाम म्हणा किंवा आधुनिक जीवनशैलीचे प्राबल्य म्हणा, यामुळे आपल्या ग्रामीण परंपरेचा हा मौलिक ठेवा आज आपल्या आहार संस्कृतीतून दूर होत चालला आहे. एकेकाळचा घराची प्रतिष्ठा दिमाखात मिरवणारा हा कुटुंब सोहार्द संस्कृतीचा साक्षीदार आज कुठेतरी निपचित पडला आहे. त्याचे सुबक व रेखीव नक्षीकाम व वैविध्यपूर्ण आकर्षक रूप-सौंदर्य एका बंद कपाटातील बंद डब्यात निस्तेज होऊन पडले आहे. अडकित्त्या बरोबर त्याची कातर कलाही अखेरच्या घटका मोजत आहे. अडकित्ता वापरातून कायमचा बंद झाला तर हळूहळू त्याबरोबर पानपुडा, कात, सुपारी हे पदार्थही दुष्टीआड जातील. 

               दुर्दैवाने आज घरातील एकत्र पंगती भोजनाचे औचित्यच कमी झाले आहे. यास्तव  अडकित्त्याची जागा घेणारे नवे आधुनिक वा तंत्रज्ञानयुक्त पर्यायी साधनही निर्माण झालेले दिसत नाही. तसे असते तर किमान पुढील पिढीला अडकित्त्याचे पूर्वरूप वा अवशेष तरी सांगता आले असते. अडकित्त्याप्रमाणेच बहुतेक घरातील ओसरी आणि आजोबांच्या जागेलाही दुसरा पर्याय उपलब्ध नाही. मग तो रात्रीच्या जेवणानंतरचा त्यांच्या मांडीवरचा संवाद असो वा मुखशुद्धीच्या निमित्ताने कुतूहल आणि औसुक्याने भरलेला आनंद असो. या पिढीजात संस्कार परंपरेला आजचे बालपण मुकत चालले आहे. 

             म्हणूनच आज दिसेनासा झालेला, अडगळीत गेलेला हा समृद्ध परंपरेचा वारसा असलेला हा अडकित्ता पुन्हा आजोबांच्या हाती दिसावा. नातवाला या कलेचा समृद्ध वारसा लाभावा. यासाठी भारतीय संस्कृतीतील आदरातिथ्य, मंगलकार्य व कलात्मक अभिरुचीचा रुबाबदार साक्षीदार अडकित्ता पुन्हा पानपुड्यासह ओसरीत दिमाखात दिसावा हीच अपेक्षा! 


✍️ डॉ. अशोक शिंदे,

प्राध्यापक, मराठी विभाग

मुधोजी महाविद्यालय, फलटण 

रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

आगळ लेख क्र. १३

 आगळ 

             आमच्या गावच्या पूर्वेला एक वस्ती आहे. पूर्वी तिथे अनेक वाडे होते. यामध्ये एक मोठा वाडा होता. भाऊंचा वाडा म्हणून हा वाडा ओळखला जायचा. चहूबाजूंनी उंच व रुंद चिरेबंदी भिंती, उंच भव्य जोतं, पश्चिमेला मुख्य दरवाजा तर पूर्व व उत्तरेला दोन दरवाजे, आत दोन चौक आणि मागच्या बाजूला गोठा असा हा भक्कम वाडा. इथं सतत माणसांची वर्दळ असे. शेतमजूर, गुराखी आणि इतर काही लोक यांचा इथं सतत राबता असे. आमचे वडिलही अधून मधून कामानिमित्ताने या वाड्यात जायचे. त्यांच्या बरोबर मीही कधी कधी या वाड्यात जायचो. 

        मुख्य दरवाज्यातून वाड्यात प्रवेश करताना मोठी चौकट ओलांडावी लागत असे. वाड्याला शोभेल असाच भक्कम देखणा असा हा मुख्य दरवाजा होता. सागाची चौकट आणि दोन पाखी दरवाजावर कोरीव काम करण्यात आले होते. सात- साडेसात फूट उंचीचा हा दरवाजा इतका जड आणि मजबूत होता की, लहान मुलांना सहजपणे तो लावता - उघडता येत नसे. मात्र जवळ कोणी मोठी माणसे नाहीत अशी संधी साधून कधी - कधी आम्ही लहान मुले हा दरवाजा आतून बंद करण्याचा प्रयत्न करायचो. मोठ्या नेटाने दरवाजाच्या दोन्ही बाजू ढकलून तो बंद करण्याचा आमचा प्रयत्न असे.   कधीतरी दरवाजा बंद करण्यात आम्हाला यश यायचं. 

             या दरवाजाच्या आतील बाजूने चौकटीच्या मध्यावर दगडी भिंतीत दोन्ही बाजूंना दोन चौकोनी खाचा किंवा खोबण्या होत्या. यातील उजवीकडील खोबणी दरवाजाच्या रुंदीपेक्षा थोडी लांब होती. तिच्यात एक चौकोनी लाकडाचा ओंडका ठेवलेला होता. हा लाकडी ओंडका लाकडी खणा सारखाच चौरस आणि गुळगुळीत होता. त्याच्या तोंडाला गोलाई देऊन बरोबर मध्यावर एक लोखंडी कडी बसवलेली होती. दरवाज्याच्या डाव्या बाजूची खोबणी भिंतीत साधारण एक फूट आत होती. दरवाजा आतून बंद केला की लोखंडी ओंडक्याच्या कडीला ओढून त्याचे तोंड डाव्या बाजूच्या चौकोनी खोबणीत घुसवले जायचे. एकदा हा लाकडी चौकोनी दांडा आडवा झाला की बाहेरून दरवाजा कितीही ढकलला तरी दार उघडले जायचे नाही. हा चौकोनी लाकडी ओंडका म्हणजेच ‘आगळ’. 

             दरवाजा आतून बंद करून हा आगळ दोन्ही भिंतीत सरकवला की वाडा अगदी पोलादी पेटीत बंद झाल्यासारखा वाटायचा. अशा प्रकारचे आगळ या वाड्याच्या सर्वच दरवाजांना होते. त्यामुळे दरवाजे आतून लावून घेऊन आगळ सरकवला की मग अख्खा वाडाच सुरक्षित व्हायचा. प्राचीन काळापासून वाडा किंवा घराच्या सुरक्षेचं चोख कार्य करणारे  ‘आगळ’ हे ग्रामीण संस्कृतीतील पारंपरिक साधन आहे. साधारणपणे लांबट गोलसर किंवा चौकोनी कडीसारखा लाकडी तुकडा म्हणजे आगळ. मानवी ग्रामीण संस्कृतीत सुरक्षा आणि आधार देण्याचे मोलाचे कार्य ‘आगळ’ या साधनाने साधलेले आहे. भारतीय संस्कृतीच्या विविध कालखंडात या आगळाला विशेष महत्त्व असलेले पहावयास मिळते. 

            प्राचीन काळी सिंधू संस्कृतीत घरांना व्यवस्थित दारे होती. उत्खननात दिसणारे चौकट, खाचा, सरकवणारे आडवे लाकडी साधन हे आगळाचे प्राथमिक रूप असावे असे समजले जाते. वैदिक व उत्तरवैदिक काळात ‘गृहसंरक्षण’ ही महत्त्वाची संकल्पना आली. धार्मिक ग्रंथांत गृहपालक देवता व द्वारपाल यांचा उल्लेख आहे. याच संकल्पनेतून दरवाजा आतून घट्ट बंद करण्याची पद्धत उदयास आली असावी.  गुप्तकालीन व प्राचीन नगररचना या काळात राजवाडे, मठ, देवळे यामध्ये भक्कम लाकडी दरवाजे प्रचलित होते. दरवाजा आतून बंद करण्यासाठी लाकडी सरकवटा किंवा आगळ याच काळात वापरले जाऊ लागले.

          मध्ययुगीन काळात इस्लामी स्थापत्यशैलीत व हिंदू-मराठा स्थापत्यशैलीत आगळाचे व्यापक रूप आढळते. किल्ल्यांचे मोठे दरवाजे आतून अडवण्यासाठी जाडसर लाकडी आगळ वापरले जात असत. गावातील वाड्यांत, हवेल्यांत मात्र साधे लाकडी आगळ लावले जात. आक्रमण किंवा दरोडे यावेळी हे आगळ मोठे बळकट रक्षण साधन ठरायचे. शिवकालीन रायगड, जंजिरा, प्रतापगड या किल्ल्यांत दुहेरी-तिहेरी आगळ आढळतात. ग्रामीण घरांत मात्र आगळ साधेच असायचे. वाडे व देवळात मात्र जाडसर, लांब लाकडी पट्ट्या चौकटीवर लावल्या जायच्या. पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांनी कुलूप, चावी, धातूचे सरकवटे आणले, तरी ग्रामीण वाड्यांत व किल्ल्यांत पारंपरिक आगळ टिकून राहिलेले  होते. 

          आधुनिक काळात शहरी भागात लोखंडी व काँक्रीट गज, लोखंडी बोल्ट अशी पर्यायी व्यवस्था आली. मात्र या काळातही ग्रामीण भागात काही ठिकाणी लाकडी आगळाचा वापर होतच होता. कारण ग्रामीण भागात या काळात वाडे टिकून होते. पुढे वाडा संस्कृती हळूहळू लोप पावत गेली. नवीन घरे बांधली जाऊ लागली. त्यामुळे अशा घरात काही ठिकाणी लाकडी आगळाऐवजी लोखंडी सरकवटे बसवले जाऊ लागले. या काळात आगळाचे स्वरूप बदलले असले तरी त्याचा  वापर मात्र सुरूच होता. 

             अलीकडच्या काळात मात्र संपूर्ण देशात आधुनिक पद्धतीची गृहरचना होत आहे. जुणे वाडे, देवळे, गढ्या आज जीर्ण होऊन गेल्या आहेत. या वास्तुंचे बुरुंज, तटबंदी आणि प्रवेशद्वारे देखील ढासळत चालले आहेत. अनेक जूने वाडे पाडून तेथे नवी इमारत वा बंगला उभारला जात आहे. आधुनिक घरांप्रमाणे आज आधुनिक सुरक्षा व्यवस्था देखील निर्माण होत आहे. घरांच्या सुरक्षेसाठी आता नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामध्ये सीसीटीव्ही, इलेक्ट्रॉनिक लॉक, अलार्म सिस्टीम अशी आधुनिक सुरक्षा उपकरणे बाजारात आली आहेत. त्यामुळे आगळ ही संकल्पना आता हळूहळू लोप पावत चालली आहे. त्यामुळे जुन्या वाड्या, हवेल्या व देवळातील आगळ आज जीर्ण अवस्थेत दिसत आहेत. 

          आगळ हे केवळ आपल्या घराचे सुरक्षा साधन नव्हते तर ते घराची मर्यादा, सुरक्षितता आणि संस्कृतीचेही प्रतीक होते. प्रारंभी आगळ फक्त शारीरिक सुरक्षा आणि 

गृहसंरक्षणाचे साधन होते. नंतर मात्र ते सार्वत्रिक तथा साम्राज्य संरक्षणाचा अविभाज्य भाग बनले. दुर्गरक्षणाचा मुख्य घटक म्हणून आगळ महत्त्वाचा ठरला. आजच्या आधुनिक काळात त्याचे स्थान लोखंडी वा तांत्रिक साधनांनी घेतले असले तरी  आपल्या ग्रामीण संस्कृती व परंपरेचे प्रतिक म्हणून आगळ जपून ठेवणे गरजेचे आहे. 

            आपल्या घर आणि मालकाला हल्ले, दरोडे, आक्रमण यापासून वाचण्यासाठी भक्कमपणे बंदोबस्त करणारा हा आगळ मात्र आज स्वतःच असुरक्षित झाला आहे. कुठेतरी अडगळीत किंवा वाड्याच्या पडक्या अवशेषात अस्ताव्यस्तपणे तो बुजून गेला आहे. घर, गाव, साम्राज्य आणि संस्कृतीच्या सुरक्षेचा साक्षीदार असलेला हा आगळ आज अस्तंगत पावत चालला आहे. बाहेरच्या जगाचा धक्का बाहेरच्या बाहेर थोपवून मालकाशी इमान राखत अख्या कुटुंबाला शांत व निर्घोरपणे झोपी घालणारा हा आगळ आज मात्र अखेरच्या घटका मोजत आहे. आजच्या यांत्रिक कुलपांच्या आणि इलेक्ट्रॉनिक गजांच्या जगात या साध्या दिसणाऱ्या आगळाचे अस्तित्त्व जपणे  आपल्यापुढे मोठे आव्हान आहे. 

            आपली पारंपारिक घरे साधी, पण भक्कम होती. दरवाजा बंद केला आणि आतून आडवा लाकडी आगळ सरकला की घर जणू अभेद्य किल्ला व्हायचं. हे आगळ म्हणजे केवळ लाकूड नव्हतं, तर मनःशांतीचं आणि निर्धोकपणाचं ते औषध होतं. बाहेर दरोडेखोर, लांडगे, वादळं असली तरी आत बसलेलं कुटुंब निश्चिंत झोपायचं ते केवळ आगळाच्या भरवशावर. आगळाने बंद केलेला दरवाजा म्हणजे फक्त बाहेरच्या माणसाला अडवणं नव्हे, तर आतल्या जगाला सुरक्षित ठेवणं होतं. 

          आज मानवी सुरक्षा, मालमत्ता सुरक्षा याकरिता वैयक्तिक, सामूहिक व शासकीय स्तरावर अनेक उपाय योजना वा विविध उपक्रम राबविले जातात. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काही कायदेही करण्यात आले आहेत. मात्र आगळाची मजबुती आणि विश्वासार्हतेची सर त्याला येणार नाही. 

              ज्या आगळाने मानवी संस्कृतीला स्वसंरक्षणाचा मूलमंत्र दिला, सुरक्षिततेची हमी दिली असे हे विश्वासचं प्रतिक आणि घराचा खंबीर राखणदार आपण आहे त्या स्थितीत जपायला हवा. घराच्या सुरक्षेबरोबरच घराचं घरपण शाबूत राखणारा हा ‘आगळ’ सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. म्हणूनच अडगळीत पडलेला हा ‘आगळ’ उचित जागेवर सरकला जावा एवढीच अपेक्षा!


डॉ. अशोक शिंदे

प्राध्यापक, मराठी विभाग

मुधोजी महाविद्यालय, phalatan

Mob. 9860850344