मंगळवार, २५ मार्च, २०२५

अडगळीतील समृद्धी - लेख क्र.६

           नांगर 

          वाटच्या वाटसरा sss काय बघतो भवताला sss ! बघतो भवताला न् जोडी खिलारी नांगराला sss !! हं राजाsss चल परधान्या sss !!! अशा गोड सुरात तांबडं फुटायच्या वेळेला गोमाईच्या मळ्यातून माणिक भाऊंचं गाणं ऐकू यायचं. खरं तर या दिवसात सगळ्याच शिवारात असे नांगरणीचे सूर घुमत असत. मात्र गोमायचा मळा गावच्या वऱ्हालाकडं असल्याने त्याबाजूचा आवाज अधिक ठळक यायचा. त्यात भाऊंचा  आवाज जरा पहाडी. त्यामुळे  त्यांचं गाणं सहज ऐकू यायचं. गोमाईचं शिवार तसं अख्ख बागायतीचकुठं काळीकुठं पोयट्याची तर कुठं काहींसीचोपनाची जमीन.  त्यामुळे किमान चार बैलांची नांगरट या रानात चालायची. उन्हाच्या आत पहिला पारुग मारायचा असा भाऊंचा बेत असायचा.  त्यामुळे चांदणी उगवली की भाऊंची  नांगरणीची तयारी सुरु व्हायची. त्यासाठी सायंकाळच्या पाहरीच  भाऊ दोन शिळवटी, नांगर आणि लांबलचक दोन वडी असा सारा सर्जाम गाडीत भरून ठेवायचे. मग पहाटे पहाटे बैलगाडी जुपून दोन बैलं माघं साटीला बांधून एका जोडीदाराला संग घेऊन रानात निघायचे. 

          रानात पोहोचताच गाडीतील सर्व सामान खाली घेतलं जायचं. भाऊंकडं नऊ नंबरी लोखंडी नांगर होता. या नांगराला सहा - सात फूट लांबीच्या दोन लोखंडी पट्ट्या म्हणजेच दांड्या होत्या. ठराविक अंतरावर नट बोल्टांनी जोडलेच्या या दांड्याच्या पुढच्या टोकाला एक त्रिकोणी कडी बसवलेली होती. या कडीत आधीच एक छोटी लोखंडी गोल कडी ओवलेली असे. त्रिकोणी कडीची पुढची बाजू तीन ठिकाणी वळवल्याने तिच्या महिरूपी आकारासारख्या तीन खाचा दिसत असत. प्रत्यक्ष नांगरताना नागराचं तास सरळ येईल अशा हिशोबानं यातील छोटी कडी नेमक्या हव्या त्या खाचेत अडकवली जायची. ही कडी मधल्या खाचेत असेल तर नागराचं तास सरळ पडायचं. मात्र नांगर तिरका किंवा वाकडा चालत असेल तर ही कडी त्यानुसार डाव्या उजव्या खाचेत ठेवावी लागायची.

            या त्रिकोणी कडीच्या मागे जमिनीवर चालेल असं लोखंडी चाक बसवलेलं होतं. लोखंडी दांडीच्या मागच्या बाजूला नट बोल्टांनी एक मजबूत लोखंडी तिकाटणं जोडलेलं होतं. या तिकाटण्याची दोन टोके दांडीला तर एक टोक खालच्या बाजूला होतं. या खालच्या टोकाला एक वक्राकार लोखंडी फळी अडकवली होती. या फळीच्या पुढच्या टोकाला एक टोकदार पोलादी फाळ बसवलेला होता. जमिनीत घुसून नांगरण्याचं मुख्य काम या फाळाचंच असे. ही लोखंडी फळी एका विशिष्ट रितीने तिकाटण्याला अडकवलेली असे, जेणेकरून मुरडानाच्या वेळी नांगर उचलताच ती फळी तिकाटण्याच्या दोन्ही बाजूला येऊ शकेल.  या फळीला खाली व वर अशी दोन छोटी छिद्रे होती. त्यात एक लोखंडी सळी अडकवली जायची. त्यामुळे नांगरताना फळी हालत नसे. मुरडानाच्या वेळी नांगराची पलटी करताना ती लोखंडी सळी आधी काढून घेतली जात असे. मग नांगर पलटी करताच फळीची खालची बाजू वर यायची. लोखंडी सळी पुन्हा फळीच्या वर आलेल्या छिद्रात अडकवली जायची. तिकाटण्याचा मागच्या टोकाला नंगाराच्या मुठीचा भाग जोडलेला होता. या भागाला हातात धरता येतील अशा दोन मुठी आणि खाली दोन आडवे लोखंडी गज असा सीडीसारखा भाग जोडलेला होता.

          सुरुवातीला हा नांगर बांदाला लावला जायचा. मग भाऊ या नांगराची झुपाझुपी करायचे. प्रथम नांगराच्या पुढं दोन शिलवटी ठेवल्या जायच्या. पहिल्या शिळवटीच्या मध्यभागी वडीचा कासरा घट्ट बांधून वडीची मुदन नांगराच्या पुढल्या बाजूच्या कडीतून ओवून तिच्यात एक बुटारणं अडकवलं जायचं. हे बुटारणं म्हणजे लाकडी तुकडा होय. अशारितीने दुसऱ्या शिळवटचीही वड बांधली जात असे. मग दोन्ही शिळवटीत बैलं जुंपली जायची. पहिल्या बैलजोडीच्या वेसनीला कासारा बांधून तो जोडीदाराच्या हाती असायचा. नागराचं तास सोडून बैलं बाजूला जायला लागली तर या कासऱ्याच्या द्वारे बैलं जाग्यावर आणली जात असत. नांगर सुरु करताना भाऊ दोन्ही हातांनी नांगाराच्या मुठी धरायचे आणि जोडीदार नांगराच्या चाकावर कधी उभा तर कधी एका पायानं दाब देत बैलं हाकायचा. नांगरटीला अशी सुरुवात व्हायची. 

           नागराचं पहिलं तास बांदाच्या विरुद्ध बाजूला पडेल अशा रितीने नांगराची फळी लावली जात असे. नांगरट नेहमी रानाच्या लांबीच्या बाजूने म्हणजेच उभी केली जात असे. उभी नांगरणी झाल्यावर मग शेवटी आडव्या बाजूवर आडतासं घालून नांगरट पूर्ण केली जात असे. बांदाच्या शेवटच्या टोकाला नांगर गेला की मग बैलं मागे वळवली जायची. नांगरही मागे फिरायचा. यावेळी भाऊ दोन मुठी वर उचलून तिकाटण्यातून नांगराची फळी पलटी करायचे. त्याआधी भाऊ ती लोखंडी सळी आधी काढायचे. पलटीमुळे फळीची खालची बाजू वर आली की, भाऊ ती लोखंडी सळी पुन्हा फळीच्या वर आलेल्या छिद्रात अडकवायचे आणि नांगर पुन्हा तासाला लागायचा. असे प्रत्येक मुरडानाच्या वेळी केले जायचे. अशी दोन - तीन तासं चांगली पडली की, मग भाऊंचं गाणं सुराला लागायचं आणि नांगरटही सुताला लागायची. बैलांना कामाचा त्रास जाणवू नये म्हणूनच अशी गाणी गायली जात असत. उन्हाचा प्रहर सुरु होण्याआधी नांगर चालवला जायचा. एकदा ऊन चटकायला लागलं की, नांगर सोडला जायचा. शिवार मोठं असेल तर मग दिवस कलल्यावर शिरवाळ असताना नांगर पुन्हा जुपला जायचा.

             साधारणतः सुगी उरकली आणि धान्य कणगीत पडून गुडाच्या गंजी लागल्या की नांगरटीला सुरुवात व्हायची. मात्र त्याआधी उकिरड्यातील वर्षभराचे खत रानात पसरवले जात असे. तो पर्यंत उन्हाळाही चांगलाच जाणवू लागलेला असायचा. नांगरणी ही उन्हाळ्यातच केली जात असे. कारण या दिवसात उन्हामुळे रान चांगलेच भाजून निघायचे. नांगरटीची ढेकळे उन्हामुळे तापतात आणि ठिसूळ बनतात. पुढे पाऊस पडला की सर्व नांगरट विरघळून रान आपोआप हावार होऊन जाते. नांगरट हा जमिनीच्या मशागतीचा पहिला टप्पा होय. जमिनीत योग्यरित्या हवा खेळती राहावी, पिकांना पोषण मिळावे आणि तणांचे नियंत्रण व्हावे यासाठी नांगरणीची प्रक्रिया केली जात असे. नांगरणीसाठी प्राचीन काळापासून वेगवेगळी साधने आणि तंत्रे विकसित होत गेलेली दिसतात. प्राचीन काळात जमिनीला फक्त कुदळी किंवा कोयत्याच्या साहाय्याने उकरून पेरणी केली जात असे. आदिवासी समाजांमध्ये आणि काही दुर्गम भागांमध्ये आजही ही पद्धत दिसून येते.पुढे नांगर तयार केला गेला. त्यानंतर मात्र भारतीय कृषी संस्कृतीत शेती मशागतीचे पारंपरिक साधन म्हणून हा नांगर सर्वकालीन उपयुक्त ठरलेला दिसतो. नांगर या साधनास भारतीय कृषी संस्कृतीत मोलाचे स्थान असलेले दिसते.

            भारतात प्राचीन काळापासून नांगर शेतीसाठी एक महत्त्वाचे साधन राहिले आहे. नांगराचा विकास हा तांत्रिक आणि सामाजिक बदलांनुसार होत गेलेला दिसतो. सिंधु संस्कृतीमध्ये सिंधु खोऱ्यातील लोथल आणि कालीबंगन या ठिकाणी नांगराच्या खुणा आढळतात. या काळातील नांगर लाकडी असायचा आणि तो बैलांच्या साहाय्याने ओढला जात असे. याकाळात शेतीसाठी सरळ रेषेत चर पाडण्याची पद्धतही प्रचलित होती. वैदिक काळात ऋग्वेद आणि अथर्ववेद यामध्ये ‘हल’ (नांगर) चा उल्लेख आढळतो. याकाळातही नांगरासाठी बैलांचा उपयोग केला जात असे. जमिनीची नांगरणी करून गहू, तांदूळ आणि जवसासारखी पिके या काळात घेतली जात असत. महाजनपद काळात नांगराचा उपयोग अधिक प्रमाणात वाढला आणि तो शेतीसाठी अत्यावश्यक बनला. पुढे लोखंडाचा शोध लागल्यानंतर, लाकडी नांगराला लोखंडी टोक (फाळ) जोडण्यात आले. अधिक खोलवर नांगरणी करण्यासाठी नांगर असा सुधारला गेला. पुढे मौर्यकाळात कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात नांगरलेल्या आणि नांगर न केलेल्या जमिनीचा उल्लेख आढळतो. याकाळात मोठ्या प्रमाणावर शेती करण्यासाठी लोखंडी फाळ असलेल्या नांगराचा उपयोग वाढलेला दिसतो. तसेच बियाणे पेरण्यासाठी नांगरासोबत विशेष चर खोदणाऱ्या साधनांचाही विकास याचा काळात झालेला होता. 

          सातवाहन व गुप्तकाळात हा नांगर अधिक विकसित झाला आणि खोलवर नांगरणी होऊ लागली. याकाळात शेती अधिक उत्पादनक्षम बनली. याकाळात काही ठिकाणी दुहेरी नांगरणी सुरू झाली. चोल, चालुक्य, राष्ट्रकूट आणि पाल या राजवंश काळातही मोठ्या भूभागावर शेती करण्यासाठी नांगराचे मोठे प्रकार तयार झाले होते. विशेषतः या काळात दक्षिण भारतात भातशेतीसाठी विशिष्ट प्रकारचे हलके नांगर प्रचलित झालेले होते. तर उत्तर भारतात गहू व ज्वारीसाठी जड लोखंडी नांगर वापरण्यात येऊ लागले. मुघलकाळात मोठ्या जागेवर शेती करण्यासाठी नांगर सुधारण्यात आला. या काळात नांगरणीसाठी बैलांसोबत कधी कधी घोड्यांचाही उपयोग केला जाऊ लागला. भात शेतीसाठी हलके नांगर आणि इतर पिकांसाठी जड नांगर याकाळात प्रचलित होते. ब्रिटिश कालखंडात भारतात नांगरणी अधिक सोपी करण्यासाठी विविध प्रकारचे लोखंडी नांगरही उपलब्ध होत गेले. किर्लोस्कर कंपनीने याचा काळात १९०३ साली भारतात पहिला लोखंडी नांगर तयार केला होता. या नांगरामुळे भारतीय शेतकऱ्यांना अधिक कार्यक्षमतेने शेती करणे शक्य झाले. पारंपरिक लाकडी आणि लोखंडी नांगराबरोबरच इंग्रजांनी ट्रॅक्टरसाठी उपयुक्त असे यांत्रिक नांगरही याच काळात आणले.

             स्वातंत्र्यानंतरचा काळात नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. पारंपरिक लाकडी व लोखंडी नांगरासोबत आधुनिक रोटावेटर  आणि हायड्रॉलिक नांगर वापरले जाऊ लागले. हरितक्रांती नंतरच्या काळात तर लाकडी नांगर पूर्णतः बंदच झाले आणि लोखंडी नांगर देखील हळू हळू मागे पडत गेले. आज तर आदिवासी आणि दुर्गम भाग वगळता महाराष्ट्रात लोखंडी नांगरट होताना दिसतच नाही.  अत्याधुनिक तंत्र आणि यंत्राच्या माध्यमातून अशा साधनाची निर्मिती होत असल्याने आज शेती पूर्णतः या साधनांच्या द्वारेच केली जात आहे.  नगदी पिकांच्या माध्यमातून  हाती येणारा पैसा आणि शासकीय तथा खाजगी संस्थांच्या माध्यमातून शेती आणि शेती पूरक उद्योगासाठी सहज आणि मुबलक उपलब्ध होणारं अर्थसहाय्य यामुळे शेतीच्या मशागतीची सर्वच साधने आज यांत्रिकी स्वरूपाची दिसत आहेत. त्यामुळे शेतीसाठी बैल किंवा इतर प्राण्यांचा वापर होताना  दिसत नाही. आज शेतीच्या मशागतीच्या सर्वच कामात ट्रॅक्टरचा वापर होत आहे. ट्रॅक्टरमुळे बैल - गोठा ही पारंपरिक साधने अंगणातून नाहीशी होताना दिसत आहेत.            

            एकेकाळी बारा बैलांच्या दावणीने शोभून दिसणारा गोठा आज ट्रॅक्टरसाठी पार्किंग शेड बनलाय. गाई - वासरांच्या हंबरण्या - चेकाळण्याने आणि बैलांच्या डरकाळीने घुमणाऱ्या गोठ्यात आज ट्रॅक्टरचं यांत्रिक थरथरणं घरघरत आहे. नांगर लाकडी असो की लोखंडी त्यामुळे जमिनीची नैसर्गिक सर्जनता राखली जात असे. पिकासाठी आवश्यक तितकीच भुई उकरली जात असे. त्यामुळे काळ्या आईची  कूस सतत सुदृढ व समृद्धतेने भरली जायची. आता ट्रॅक्टरचा फाळ जमिनीच्या गर्भाचा काळ बनल्याने निर्मितीची सर्व प्रक्रियाच अनैसर्गिक होत आहे. यामुळे जमिनीची सकसता नि सक्षमताच नष्ट होत असल्याचे जाणवत आहे. 

            नांगरट करणे हे कष्ट आणि कोशल्याचे काम असते. नांगरणीच्या कामात नांगर धरणारा आणि हाकलणारा ही दोघेही कुशल असावी लागतात.  रानाच्या प्रतवारीनुसार नांगरटीची खोली आणि तासाचा घास यांचे विशिष्ट प्रमाण ठरवून नांगरणी करावी लागते. याकामी नांगरधाऱ्याची कुशलता महत्त्वाची असते. नांगराच्या पुढच्या चाकाची दिशा व जागेचे अंतर यानुसार तो नांगर लावत असतो. नांगराच्या तासात फाटा पडणार नाही याची काळजी तो घेत असतो. यासाठी बैलं तासाबाहेर जाणार नाहीत याची काळजी हाकलणाराने घ्यायची असते. बैलांना आणि आपल्याही कष्टाला गती आणि विरगुळा म्हणून हे दोघेही सतत मोठमोठ्यानं गाणं गात राहतात. ही गाणी म्हणजे लोकजीवनातील विविध भावभावना व्यक्त करणाऱ्या ओव्याच असतात. या गाण्यातील विशिष्ट लय आणि तालामुळे बैलांमध्ये उत्साह निर्माण होऊन त्यांचा श्रमपरिहार होत असे. याकाळात बैलांच्या वैरणीचीही विशेष काळजी घेतली जायची. त्यांना वेळच्या वेळी पेंड, खुराक दिले जात असे. या बैल मेहनतीतूनच शेतात मोती पिकतात याची जाणीव ठेऊन विशेषत: या काळात बैलांना खूपच जपले जात असे. नांगरणी संपल्यावर अंगातील नांगरला कधी कधी वासरे बांधली जायची. यावेळी अल्लड खोंडांणा आपल्या ताकतीचा काहीसा अंदाजही घेण्याची संधी दिली जात असावी असं मला वाटते. मात्र नांगरटीला जो टिकतो तोच खरा बैलं असं एक सूत्रच त्याकाळी ठरलेले असे. म्हणूनच त्याकाळी नांगरटीसाठी खास बैलं पाळले जायचे. कारण बैलं नांगराने केलेली नांगरणी ही बरकत आणि समृद्धीची नांदीच असायची. 

         नांगर हे केवळ जमिनीच्या मशागतीचं साधन नव्हते, तर नांगरामुळे लोकजीवनाचे सामाजिक आणि सांस्कृतिक बंध घट्ट होत असत. नांगरट हा कृषी संस्कृतीचा एक उत्सवच असायचा. यामध्ये सर्व घटक आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पडायचे. शेतकरी अल्पभूधारक असो वा मोठा जमीनदार असो, त्यांच्या शेताची नांगरट करावीच लागत असे. मोठ्या बगाईतदारकडे तर खास नांगरणीसाठी सोयरे - धायरे आपल्या नांगरणीच्या सर्व सर्जामासह येऊन मुक्कामीच राहायचे. सगळ्या शिवराची नांगरट झाल्याशिवाय ते माघारी घरी जात नसत. ज्यांच्याकडे बैलं व साधनाची कमतरता आहे अशा घटकांनाही शेजारी वा गावातील बड्या असामीकडून सहकार्य केले जायचे. नांगरणीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी सावडीही होत असत. नांगरणीच्या काळात शिवरातच न्याहाऱ्या व्हायच्या. त्यामुळे स्वयंपाक घरात गृहिणी खास नांगरकऱ्यांच्या शिदोरीची विशेष दक्षता घेत असत. यानिमित्ताने सायंकाळी घरी स्वादिस्ट आणि सुरुची अशा विशेष भोजनाच्या पंगती बसायच्या. अशावेळी पाहुण्यांसाठी आणि कामकऱ्यांसाठी जेवणाचा हा खास बेतंच असायचा. अशारितीने नांगरणीच्या निमित्ताने संगत, सहभोजन आणि सहकार्य यातून सामाजिक सौहार्द वाढीस लागायचे. 

         नांगर जुंपणे आणि हाकलणे हे आनंदाचे आणि मजेचे काम समजून लहान मूले या कामात उगीच घोटाळत असायची. विशेषतः नांगराच्या मुठीजवळच्या लोखंडी शिडीवर बसायला खूप मज्जा यायची. कधी कधी शिरवाळाच्या वेळी भाऊ आम्हाला आळीपाळीने त्यावर बसवायचे. रान जर कडक लागलं तर आम्ही चाकाच्या जवळ दांडीवर तोल सांभाळून बसायचो. नांगरटीच्या आवाजात आवाज मिसळत चालणाऱ्या चाकाकडे पाहणे आमच्यासाठी खूप औसुक्याचे असायचे. कुतूहल किंवा जिज्ञासापूर्ती म्हणून कधी कधी लहानग्यांच्या हाती भाऊ नांगर सोपवायचे तेंव्हा कृषी संस्कृतीत नकळत नाळ जोडली जायची. यातूनच कृषी कर्म- कर्तव्याची जाणीवही व्हायची आणि नांगरटीची शिकवण व संस्कार ही सहजपणे घडत जायचे. 

            नांगर केवळ जमिनीची नांगरणी करण्याचे साधन नव्हते तर ते लोक संस्कृतीच्या मशागतीचेही उत्तम माध्यम होते. नांगर हे कृषी संस्कृतीत निर्माण झालेले पहिले साधन आहे. तो लाकडाचा असो वा लोखंडाचा, त्याने भुई नांगरण्याचे काम अगदी चोख आणि प्रामाणिकपणे पार पारलेले आहे. म्हणूनच जमीन उकरून काळ्या आईचा कस आणि कुशीला सदैव चिरंजीवित्त्व बहाल करणारा हा नांगर मानवी जीवनाच्या वैभवाचा खरा साक्षीदार होता असे मला वाटते. मानवीसंस्कृतीत नांगरास सुफलीकरणाचं प्रतिक मानले जाते. कृषी संस्कृतीचा प्रारंभच नांगरणीच्या प्रक्रियेतून झाला आहे. मात्र मानव, पशु आणि पक्ष्यांच्या दाणा - चारासाठी जमीन उकरून पिकं फुलविणारा नांगर आज स्वतःच कुठंतरी धुळीत बुजून गेलेला दिसत आहे. एकेकाळी जोमदार पिकाच्या माध्यमातून तमाम कृषीजीवनाला समृद्धी बहाल करणारा हा नांगर आज क्षीण होऊन अडगळीत पडलेला  दिसत आहे. धन्याच्या शिवारात फाळ रुतवून दिमाखात उभा राहणारा नांगर आज मात्र भंगारात अखेरच्या घटका मोजताना दिसत आहे. आपल्या नऊ नंबरी नांगर आणि चाव्हरी बैलांचं कौतुक अभिमानाने सांगणाऱ्या शेतकऱ्यांच्या वैभवाला जणू आज या नव्या युगाची दृष्टचं लागलेली दिसतेय.  आधुनिकतेच्या या युगात यांत्रिकीकरणाची चाकं थांबवता येणं कठीण आहे. मात्र तरीही कृषी संस्कृतीचा हा मौलिक पारंपरिक ठेवा जपायला हवा आणि जोपसला जावा. हा गत वैभवाचा मळा पुन्हा बहरावा असं वाटत असेल, तर साऱ्या शिवारात समृद्धीचा हा नांगर पुन्हा फिरावा हीच अपेक्षा!  

✍️ डॉ. अशोक शिंदे, फलटण

9860850344


शनिवार, ८ मार्च, २०२५

अडगळीतील समृद्धी - लेख क्र. 5

            कणगी 

           खळ्यावर धान्याची रास लागली की, प्रथम त्या  राशीची विधिवत पूजा केली जाते. नंतर खळ्यावरचं धान्य पांगवून चांगली तीन - चार उन्हं दिली जातात. एकदा धान्य वाळलं याची खात्री झाली की लगेच पुढची लगभग सुरु होते. खळ्यावरंच धान्याची एक - एक किंवा सव्वा - सव्वा मणाची पोती भरली जातात. एकदा सर्व धान्य भरून झालं की पोती मोजून ठरल्याप्रमाणे खोतीची वा वाट्याची वाटणी बाजूला काढली जात असे. आमचे वडील दरवर्षी कोयना भैजींची खोती घेत असत. त्यामुळे वाटणीवेळी आम्हीही खळ्यावरच असायचो. आधी खोतीवाल्याचा माल त्यांच्या घरी पोहोच करायचा असा भैजींचा दंडक. त्यामुळे मालाने भरलेल्या बैलगाडीत बसून आम्हीही घराकडे निघायचो. आपल्या घरी आज धान्य येणार याचा लई आंनद व्हायचा आम्हाला. घरी आई पुन्हा एकदा बैलांसह पोत्यांचीही पूजा करायची. खोतकरांचा माल त्यांच्या घरी जाईपर्यंत भैजीला चैन पडत नसे. त्यामुळे भैजी स्वतः बैलगाडीबरोबर खोतकराच्या घरापर्यंत जात असत. खोतकरांचा माल त्यांच्या घरात पडला की मग खळ्यावरचा उरलेला सगळा माल भैजींच्या वाड्यावर नेला जात असे. एकदा ओसरीला पोत्यांची थापी लागली की, मग पुढं भैजी कणगीच्या तजविजीला लागत. 

                कणगी म्हणजे त्याकाळी धान्य सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवण्याचं एक महत्वाचं साधन. आमच्या गावात प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी कणगी असायची. शेतकरी छोटा असो वा मोठा त्याच्याकडे कणगी हमखास असायचीचं. प्रतिवर्षी शिवारात होणारे धान्याचे उत्पादन लक्षात घेऊन कणगी करून घेतली जात असे. विशेषतः ज्वारी, बाजरी आणि गहू ही अन्नधान्ये साठवण्यासाठी कणगी वापरली जात असे. कमीत कमी पाच तर जास्तीत जास्त वीस मण धान्य साठवलं जाईल अशा आकाराच्या कणग्या त्याकाळी असत. मोठ्या जमीनदाराकडं तर अशा दोन - तीन कणग्या असायच्या. कणग्यांच्या आकारावरून त्याकाळी श्रीमंतीचं मोजमाप देखील केले जात असे. पतींगराव जामदारांच्या वाड्यात अशा खंडी, दोन खंडीच्या मोठमोठ्या कणग्या त्याकाळी होत्या. एकदा कणगीत माल पडला की मग मात्र शेतकरी निसूर होत असत. 

               साधारण डोक्याएवढ्या उंचीची व रांजनासारख्या आकाराची दिसणारी ही कणगी बांबूपासून बनवली जात असे. कणगी विणण्याचे काम बुरुड लोक करत असत. आमच्या पंचक्रोशीत त्याकाळी धनुदादा कणगी बनवण्यासाठी नावाजले जात होते. दादा सर्वप्रथम बांबूपासून जाड, पातळ, चपट्या आकाराच्या पट्ट्या सोलून काढत असत. कणगी बांधताना सुरुवातीला कणगीचं बूड बांधलं जायचं. हे बुड साधारण वाव - दीड  वाव व्यासाचं गोलाकार असे. यासाठी बांबू सोलून काढलेले लांब चपट्या आकाराचे पण जाडसर व मजबूत असे तोडे वापरले जात असत. दणकट व टिकाऊ कणगीसाठी नऊ तोडे वापरले जात असत. सर्वप्रथम हे नऊ तोडे मध्यावर एकत्र घट्ट बांधले की एका तोड्याचे दोन भाग होत असत. या भागांना पाऊके म्हटले जात असे. अशा प्रकारे नऊ तोड्यांचे अठरा पाऊक सुरुवातीला तयार होत असत.

                  त्यानंतर ही सर्व पाऊके एका मजबूत चपट्या कामठीने विणले जायचे. त्यास बेळसा असे म्हटले जात असे. बुडाचा असा वाव- दीड वाव व्यासाचा गोलाकार भाग या बेळसांनी विणला की जेथून पाऊके वरच्या दिशेला वळवले जातात तिथे एक वळ विणला जात असे. हा वळ तीन पात्यांचा किंवा काड्यांचा असे. या काड्यांना वळकाडी असं म्हटले जात असे. अशा वळामुळे बुडाचा भाग मजबूत व्हायचा. येथून कणगीच्या उभ्या भागाला सुरुवात व्हायची. नंतर सर्व अठरा उभे पाऊके मग पुन्हा बेलस्यांनी विनले जायचे. साधारण वीत - दीड वितीवर पुन्हा एक वळ विणला जायचा. यामुळे कणगीला भक्कम व मजबूतपणा येत असे. बुडाच्या आकारापेक्षा कणगीचा मधल्या भागाचा व्यास थोडासा मोठा व तोंडाचा थोडासा लहान असायचा. त्यामुळे धान्याचे वजन संतुलित राहत असे.

                अशा रितीने साधारण सहा - सात फूट उंचीपर्यँत कणगी विणली जात असे. पाऊके वितभर वर राहतील अशा बेताने शेवटचा मोठा वळ विणला जात असे. त्यास तोंडाची मुदन म्हटले जात असे. नंतर वर शिल्लक राहिलेले पाऊके थोडे तासून पातळ केले जात. हे पाऊके वरून मुडपून पुन्हा शेवटच्या वळातून आतल्या बाजूने खोवले म्हणजेच पाचले जात असत. अशा रितीने कणगीचं तोंड तयार होत असे. कणगीत धान्य भरण्याआधी ती ओसरीत किंवा आत घरात व्यवस्थित स्वच्छ व हवेशीर जागेत ठेवली जात असे. जमिनीवर लाकडे टाकून त्यावर लाकडी फळ्या अंथरून त्यावर कणगी ठेवली जात असे. अशा कणगीत वर्षभराची सर्व चंदी एकदम सुरक्षित राहत असे. दादाकडून अशी कणगी एकदा करून घेतली की ती सालोसाल टिकायची. अशा कणगीसाठी दादा जीव लावून मेहनत घेत असत. दादाच्या हातच्या अशा कितीतरी कणग्या गावोगावी आणि घरोघरी दिसायच्या. 

                 धान्य टाकण्याआधी कणगी माती, गवत, शेणाच्या मिश्रणाने आतून बाहेरून लिपली जात असे. कणगी मजबूत आणि हवेशीर जागेवर ठेवली जात असल्यामुळे तिच्यात धान्य दीर्घकाळ टिकत असे. शिवाय  कणगीमुळे धान्याचे किडा, मुंगी पासूनही संरक्षण होत असे. कणगीत धान्य टाकण्या आधी ते पूर्णत: वाळवले जात असे. धान्य कणगीत टाकले आणि कणगीचे तोंड लिंबाचा पाला टाकून वरून पुन्हा शेणाने लिपले की, धान्य अगदी तिजोरीत ठेवल्यासारखे सर्वांगाने सुरक्षित होत असे. अशारितीने नैसर्गिकपणे सुरक्षित धान्य साठवण्याचं कणगी हे अत्यंत उपयुक्त असे साधन होते. कृषीसंस्कृतीत अशा कणगीत धान्य साठवण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.

                भारतात प्राचीन काळापासून स्थानिक हवामान, जमीन, आणि उपलब्ध साधन सामग्रीनुसार धान्य साठवण्यासाठी विविध पारंपरिक पद्धती वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विकसित झालेल्या दिसतात. काही ठिकाणी धान्य साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘कोठी’ किंवा ‘कोठारे’ वापरण्यात येत असत. यासाठी माती, लाकूड, बांबू, किंवा दगडांचा वापर केला जात असे. मातीच्या भांड्यांमध्ये धान्य साठवण्याची पद्धतही काही भागांमध्ये प्रचलित होती. या भांड्यांना आतून तेलकट पदार्थांनी लिंपले जाई, ज्यामुळे त्यात किडी होत नसत. विशेषतः गहू, तांदूळ आणि डाळींचे साठवण यामध्ये केले जात असे. 

             पूर्व भारत, पश्चिम घाट आणि ईशान्येकडील प्रदेशात बांबूच्या मोठ्या टोपल्या धान्य साठवण्यासाठी वापरल्या जात. या टोपल्यांना शेण आणि मातीच्या थराने लिंपले जात असे. काही ठिकाणी धान्य सुती पोत्यांमध्येही साठवले जात असे. काही भागांत छताला वारा खेळता राहील अशा पद्धतीने खपरेल बसवून धान्य साठवण गृह तयार केले जात असे. काही ठिकाणी लाकडी पेट्या, किंवा झाडाच्या खोडापासून खोदलेल्या मोठ्या खोल्यांमध्येही धान्य साठवले जात असे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात धान्य साठवण्याचे साधन म्हणून  ‘कणगी’ चा वापर केला जात असे. कालानुसार कणगीच्या निर्मितीत आणि वापरात काही महत्त्वाचे बदल झालेले दिसतात.

               प्राचीन काळात सिंधू संस्कृतीमध्ये हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे आढळलेल्या धान्यागारांमध्ये कणगी समान काही लहान साठवण यंत्रणा असल्याचे पुरावे मिळतात. वैदिक काळातील वाङ्मयात ‘कोष्ठ’ किंवा ‘कोष्ठागार’ असा कणगीच्या संकल्पनेशी जुळणारा उल्लेख सापडतो. त्या काळात मातीच्या मोठ्या घटांमध्ये धान्य साठवले जात असे, ज्यामध्ये कणगीसारखी रचना होती. मौर्य आणि गुप्त काळात कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात धान्य साठवण्याच्या विविध पद्धतींचा उल्लेख आहे. याकाळात कणगीसारखी मोठी मातीची भांडी वापरली जात असत. ही भांडी हवेशीर आणि दमटपणापासून संरक्षित असत. या काळात घरगुती साठवणुकीसाठी लहान कणग्यांचा वापरही अधिक प्रमाणात होत असे.

              मध्ययुगीन काळात घरगुती आणि गावपातळीवर धान्य साठवण्यासाठी कणगीसारख्या मातीच्या भांड्यांचा मोठा उपयोग होत असे. काही ठिकाणी बांबूच्या चौकटींना शेणमातीचे मिश्रण लावून मोठ्या ‘कणगी’ सारख्या वस्तू  तयार केल्या जात असत. यामध्ये विशेषतः तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यांची दीर्घकालीन साठवणूक होत असे. मराठा आणि पेशवे काळात शेतकऱ्यांसाठी धान्य साठवणुकीच्या पारंपरिक पद्धती प्रचलित होत्या. मोठ्या कोठारांमध्ये आणि घरगुती कणग्यांमध्ये धान्य साठवले जात असे. या काळात कणगी बांधताना बाहेरून गेरू लावण्याचीही प्रथा होती, ज्यामुळे ती अधिक टिकाऊ होत असे.      

                    ब्रिटिशकालीन भारतात मोठ्या प्रमाणावर धान्य साठवण्यासाठी ब्रिटिश सरकारने आधुनिक गोदामे आणि लोखंडी संरचना आणल्या, पण ग्रामीण भागात कणगीचा वापर सुरूच राहिला. काही ठिकाणी मातीऐवजी लाकडाच्या कणग्या वापरण्यास सुरुवात झाली. धान्य टिकवण्यासाठी कणगीत निंबाची व इतर वनस्पतीची पाने यांचा उपयोग होऊ लागला. स्वातंत्र्योत्तर भारत आणि आधुनिक काळात आधुनिक गोदामे उपलब्ध झाल्यानंतरही ग्रामीण भागात कणगीचा वापर होत असे. मात्र या काळात काही ठिकाणी प्लास्टिक किंवा सिमेंटपासून तयार केलेल्या कणग्या वापरण्यात येऊ लागल्या. 

                काळानुरूप महाराष्ट्रातही अशाप्रकारे धान्य साठवण्याच्या विविध साधन सामग्रींचा वापर केला जात होता.  याकाळात महाराष्ट्रात विशेषतः कणगी हेच पारंपरिक पद्धतीने धान्य साठवण्याचे प्रमुख साधन म्हणून अधिक प्रमाणात वापरले जात असे. याकाळात महाराष्टात ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ इ. पिकांचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जात असे. कृषी पणन व विपणनाची व्यवस्था त्याकाळी प्रभावी नसल्याने ही सर्व धान्य घरातच साठवली जात असत. यासाठी कणगी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असत. कणगीमधील धान्य बराच काळ सुरक्षितपणे टिकत असल्यामुळे अस्मानी संकटात ते उपयोगी ठरत असे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात देखील महाराष्ट्रात पारंपरिक शेती केली जात होती. साखर कारखाने, औद्योगिकीकरण, सिंचन प्रकल्प यामुळे शेती व्यावसायला काही प्रमाणात चालना मिळू लागली होती. मात्र याकाळातही कणगीचा वापर बऱ्याच प्रमाणात केला जात होता. यानंतरच्या काळात मात्र कणगीचा वापर हळूहळू कमी होत गेला. 

               साधारणपणे हरितक्रांती नंतरच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषीक्षेत्राशी संबंधित विविध शासकीय धोरणे आणि विविध जलसिंचन प्रकल्प यामुळे शेती व्यवस्थापनात कमालीचे बदल झाले. यांत्रिक साधने, अत्याधुनिक अवजारे, संकरीत बियाणे, आधुनिक पिक व पाणी पद्धती यामुळे पारंपरिक शेती हळूहळू कमी होत गेली. नगदी पिकांचे प्रमाण व संख्याही वाढत गेली. बाजार समित्यांची निर्मिती झाल्यामुळे धान्य साठवून ठेवण्यापेक्षा विकण्याचं प्रमाण वाढलं. अन्नधान्यांच्या आयात - निर्यातीमुळे धान्याची उपलब्धता वाढली गेली. बाजारात सर्व प्रकारचे धान्य मिळू लागल्याने शेतकऱ्यांचा कल अन्नधान्य पिकविण्यापेक्षा नगदी पिकाकडेच अधिक वळला.  ज्वारी, बाजरी, गहू यांचे उत्पादन गरजेपुरते किंवा मर्यादित होऊ लागले. त्यामुळे ओसरीतील कणगीने तळ गाठला. 

                जसजसा काळ पुढे सरकू लागला तसतसा आधुनिकतेचा प्रवाह अधिकच जोम धरू लागला. नगदी पिकांमुळे तसेच सहज कर्ज उपलब्ध होऊ लागल्याने शेतकऱ्यांचा हाती पैसा खेळू लागला. कृषी क्षेत्रातील प्रगतीमुळे भौतिक साधनांची खरेदी आधुनिक जीवनशैलीचा अंगीकार होऊ लागला. याशिवाय शेती पूरक व्यवसाय, विविध क्षेत्रातील रोजगारांची उपलब्धता यामुळे पारंपरिक शेती व जीवनशैलीत कमालीचा बदल झाला. आहार, विहार, निवाऱ्याची साधनात आधुनिकता दिसू लागली. चौसोपी वाडे , धाब्याची घरे जाऊन त्याठिकाणी वाळू, गज, सिमेंटचे बंगले उभे राहू लागले. धान्य साठवण्याची नवनवी साधने आज बाजारात येऊ लागली आहेत. घराची खोली, आकार, रंग आणि चकचकितपणाला शोभेल अशी आधुनिक धान्य साठवण साधने आता घरात दिसू लागली आहेत. त्यातच घराच्या अघळ - पघळ वट्टा - ओसरीची जागा बंगल्याच्या चकचकित पोर्चने बळकावली आणि ओसरीतील दिमाखदार कणगी आता अडगळीत जाऊन पडली आहे. 

             एकेकाळी सर्वांना पोट भरून धान्य पुरवणारी कणगी आज स्वतःच  रिकामी होऊन अखेरच्या घटका मोजताना दिसत आहे. स्वतःच्या भक्कमतेबरोबरच मालकाच्या सक्षमतेचाही परिचय करून देणारी कणगी आता मात्र खिळखीळी झालेली दिसत आहे. घरा- ओसरीत भरलेली कणगी एकेकाळी श्रीमंतीचं आणि समृद्धीचं प्रतिक समजली जात असे. अडी- नडीच्या काळात पाव्हणे- रावळे, गरीब, भिक्षेकरू यांच्याप्रति धन्याच्या ठायीच्या औदार्य आणि सहकार्यवृत्तीला बळ देणारी ही कणगी स्वतःच आज आधारहीन झालेली दिसत आहे. कणगी लिपताना, तिच्यात धान्य भरताना, तिच्यातून धान्य काढताना तिच्याशी एक वेगळंच नातं जुळले जात असे. लहान मुलांना तर कणगीतून धान्य काढायला खूप मज्जा येत असे. तिच्यातील गारवा हवाहवासा वाटत असे. हा आनंद आज लोप पावत चालला आहे. 

              वर्षानुवर्षे सर्व प्रकारचे धान्य सुरक्षित, ठेऊन सर्वत्र समृद्धीचं भरलेपण बहाल करणाऱ्या कणगीचं एकेकाळी मानवी जीवनात महत्वपूर्ण स्थान होतं. काळ्या आईच्या कुशीतून मिळालेलं धन्याच्या कष्टाचं सोनं इमाने, इतबारे, चोख आणि सुरक्षित ठेवण्याचं अनमोल कार्य कारणारी कणगी ही निष्ठेची परिसिमा होती. म्हणूनच ग्रामीण तथा कृषी संस्कृतीला आपल्या कर्तव्याने समृद्धीचं दान देणारा हा पारंपरिक वारसा जपण्याचं कार्य व्हायला हवं. कणगीमुळेच तोडा, पाऊक, बेलसी, वळ इ. सामग्रीची एक साठवण संस्कृती निर्माण झाली. कणगी अस्तंगत झाली तर ही धान्य रक्षक संस्कृतीही लय पावेल. म्हणूनच हा ग्रामजीवनाला शतकानुशतके आधार देणारा कृषी संस्कृतीचा वारसा आणि सुख - समृद्धीचा साक्षीदार आपणास जपून ठेवायलाच हवा. बस्स एवढीच अपेक्षा ! 

✍️ डॉ. अशोक शिंदे, 

प्राध्यापक, मराठी विभाग,

मुधोजी कॉलेज, फलटण.