शनिवार, ८ मार्च, २०२५

अडगळीतील समृद्धी - लेख क्र. 5

            कणगी 

           खळ्यावर धान्याची रास लागली की, प्रथम त्या  राशीची विधिवत पूजा केली जाते. नंतर खळ्यावरचं धान्य पांगवून चांगली तीन - चार उन्हं दिली जातात. एकदा धान्य वाळलं याची खात्री झाली की लगेच पुढची लगभग सुरु होते. खळ्यावरंच धान्याची एक - एक किंवा सव्वा - सव्वा मणाची पोती भरली जातात. एकदा सर्व धान्य भरून झालं की पोती मोजून ठरल्याप्रमाणे खोतीची वा वाट्याची वाटणी बाजूला काढली जात असे. आमचे वडील दरवर्षी कोयना भैजींची खोती घेत असत. त्यामुळे वाटणीवेळी आम्हीही खळ्यावरच असायचो. आधी खोतीवाल्याचा माल त्यांच्या घरी पोहोच करायचा असा भैजींचा दंडक. त्यामुळे मालाने भरलेल्या बैलगाडीत बसून आम्हीही घराकडे निघायचो. आपल्या घरी आज धान्य येणार याचा लई आंनद व्हायचा आम्हाला. घरी आई पुन्हा एकदा बैलांसह पोत्यांचीही पूजा करायची. खोतकरांचा माल त्यांच्या घरी जाईपर्यंत भैजीला चैन पडत नसे. त्यामुळे भैजी स्वतः बैलगाडीबरोबर खोतकराच्या घरापर्यंत जात असत. खोतकरांचा माल त्यांच्या घरात पडला की मग खळ्यावरचा उरलेला सगळा माल भैजींच्या वाड्यावर नेला जात असे. एकदा ओसरीला पोत्यांची थापी लागली की, मग पुढं भैजी कणगीच्या तजविजीला लागत. 

                कणगी म्हणजे त्याकाळी धान्य सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवण्याचं एक महत्वाचं साधन. आमच्या गावात प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी कणगी असायची. शेतकरी छोटा असो वा मोठा त्याच्याकडे कणगी हमखास असायचीचं. प्रतिवर्षी शिवारात होणारे धान्याचे उत्पादन लक्षात घेऊन कणगी करून घेतली जात असे. विशेषतः ज्वारी, बाजरी आणि गहू ही अन्नधान्ये साठवण्यासाठी कणगी वापरली जात असे. कमीत कमी पाच तर जास्तीत जास्त वीस मण धान्य साठवलं जाईल अशा आकाराच्या कणग्या त्याकाळी असत. मोठ्या जमीनदाराकडं तर अशा दोन - तीन कणग्या असायच्या. कणग्यांच्या आकारावरून त्याकाळी श्रीमंतीचं मोजमाप देखील केले जात असे. पतींगराव जामदारांच्या वाड्यात अशा खंडी, दोन खंडीच्या मोठमोठ्या कणग्या त्याकाळी होत्या. एकदा कणगीत माल पडला की मग मात्र शेतकरी निसूर होत असत. 

               साधारण डोक्याएवढ्या उंचीची व रांजनासारख्या आकाराची दिसणारी ही कणगी बांबूपासून बनवली जात असे. कणगी विणण्याचे काम बुरुड लोक करत असत. आमच्या पंचक्रोशीत त्याकाळी धनुदादा कणगी बनवण्यासाठी नावाजले जात होते. दादा सर्वप्रथम बांबूपासून जाड, पातळ, चपट्या आकाराच्या पट्ट्या सोलून काढत असत. कणगी बांधताना सुरुवातीला कणगीचं बूड बांधलं जायचं. हे बुड साधारण वाव - दीड  वाव व्यासाचं गोलाकार असे. यासाठी बांबू सोलून काढलेले लांब चपट्या आकाराचे पण जाडसर व मजबूत असे तोडे वापरले जात असत. दणकट व टिकाऊ कणगीसाठी नऊ तोडे वापरले जात असत. सर्वप्रथम हे नऊ तोडे मध्यावर एकत्र घट्ट बांधले की एका तोड्याचे दोन भाग होत असत. या भागांना पाऊके म्हटले जात असे. अशा प्रकारे नऊ तोड्यांचे अठरा पाऊक सुरुवातीला तयार होत असत.

                  त्यानंतर ही सर्व पाऊके एका मजबूत चपट्या कामठीने विणले जायचे. त्यास बेळसा असे म्हटले जात असे. बुडाचा असा वाव- दीड वाव व्यासाचा गोलाकार भाग या बेळसांनी विणला की जेथून पाऊके वरच्या दिशेला वळवले जातात तिथे एक वळ विणला जात असे. हा वळ तीन पात्यांचा किंवा काड्यांचा असे. या काड्यांना वळकाडी असं म्हटले जात असे. अशा वळामुळे बुडाचा भाग मजबूत व्हायचा. येथून कणगीच्या उभ्या भागाला सुरुवात व्हायची. नंतर सर्व अठरा उभे पाऊके मग पुन्हा बेलस्यांनी विनले जायचे. साधारण वीत - दीड वितीवर पुन्हा एक वळ विणला जायचा. यामुळे कणगीला भक्कम व मजबूतपणा येत असे. बुडाच्या आकारापेक्षा कणगीचा मधल्या भागाचा व्यास थोडासा मोठा व तोंडाचा थोडासा लहान असायचा. त्यामुळे धान्याचे वजन संतुलित राहत असे.

                अशा रितीने साधारण सहा - सात फूट उंचीपर्यँत कणगी विणली जात असे. पाऊके वितभर वर राहतील अशा बेताने शेवटचा मोठा वळ विणला जात असे. त्यास तोंडाची मुदन म्हटले जात असे. नंतर वर शिल्लक राहिलेले पाऊके थोडे तासून पातळ केले जात. हे पाऊके वरून मुडपून पुन्हा शेवटच्या वळातून आतल्या बाजूने खोवले म्हणजेच पाचले जात असत. अशा रितीने कणगीचं तोंड तयार होत असे. कणगीत धान्य भरण्याआधी ती ओसरीत किंवा आत घरात व्यवस्थित स्वच्छ व हवेशीर जागेत ठेवली जात असे. जमिनीवर लाकडे टाकून त्यावर लाकडी फळ्या अंथरून त्यावर कणगी ठेवली जात असे. अशा कणगीत वर्षभराची सर्व चंदी एकदम सुरक्षित राहत असे. दादाकडून अशी कणगी एकदा करून घेतली की ती सालोसाल टिकायची. अशा कणगीसाठी दादा जीव लावून मेहनत घेत असत. दादाच्या हातच्या अशा कितीतरी कणग्या गावोगावी आणि घरोघरी दिसायच्या. 

                 धान्य टाकण्याआधी कणगी माती, गवत, शेणाच्या मिश्रणाने आतून बाहेरून लिपली जात असे. कणगी मजबूत आणि हवेशीर जागेवर ठेवली जात असल्यामुळे तिच्यात धान्य दीर्घकाळ टिकत असे. शिवाय  कणगीमुळे धान्याचे किडा, मुंगी पासूनही संरक्षण होत असे. कणगीत धान्य टाकण्या आधी ते पूर्णत: वाळवले जात असे. धान्य कणगीत टाकले आणि कणगीचे तोंड लिंबाचा पाला टाकून वरून पुन्हा शेणाने लिपले की, धान्य अगदी तिजोरीत ठेवल्यासारखे सर्वांगाने सुरक्षित होत असे. अशारितीने नैसर्गिकपणे सुरक्षित धान्य साठवण्याचं कणगी हे अत्यंत उपयुक्त असे साधन होते. कृषीसंस्कृतीत अशा कणगीत धान्य साठवण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.

                भारतात प्राचीन काळापासून स्थानिक हवामान, जमीन, आणि उपलब्ध साधन सामग्रीनुसार धान्य साठवण्यासाठी विविध पारंपरिक पद्धती वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विकसित झालेल्या दिसतात. काही ठिकाणी धान्य साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘कोठी’ किंवा ‘कोठारे’ वापरण्यात येत असत. यासाठी माती, लाकूड, बांबू, किंवा दगडांचा वापर केला जात असे. मातीच्या भांड्यांमध्ये धान्य साठवण्याची पद्धतही काही भागांमध्ये प्रचलित होती. या भांड्यांना आतून तेलकट पदार्थांनी लिंपले जाई, ज्यामुळे त्यात किडी होत नसत. विशेषतः गहू, तांदूळ आणि डाळींचे साठवण यामध्ये केले जात असे. 

             पूर्व भारत, पश्चिम घाट आणि ईशान्येकडील प्रदेशात बांबूच्या मोठ्या टोपल्या धान्य साठवण्यासाठी वापरल्या जात. या टोपल्यांना शेण आणि मातीच्या थराने लिंपले जात असे. काही ठिकाणी धान्य सुती पोत्यांमध्येही साठवले जात असे. काही भागांत छताला वारा खेळता राहील अशा पद्धतीने खपरेल बसवून धान्य साठवण गृह तयार केले जात असे. काही ठिकाणी लाकडी पेट्या, किंवा झाडाच्या खोडापासून खोदलेल्या मोठ्या खोल्यांमध्येही धान्य साठवले जात असे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात धान्य साठवण्याचे साधन म्हणून  ‘कणगी’ चा वापर केला जात असे. कालानुसार कणगीच्या निर्मितीत आणि वापरात काही महत्त्वाचे बदल झालेले दिसतात.

               प्राचीन काळात सिंधू संस्कृतीमध्ये हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे आढळलेल्या धान्यागारांमध्ये कणगी समान काही लहान साठवण यंत्रणा असल्याचे पुरावे मिळतात. वैदिक काळातील वाङ्मयात ‘कोष्ठ’ किंवा ‘कोष्ठागार’ असा कणगीच्या संकल्पनेशी जुळणारा उल्लेख सापडतो. त्या काळात मातीच्या मोठ्या घटांमध्ये धान्य साठवले जात असे, ज्यामध्ये कणगीसारखी रचना होती. मौर्य आणि गुप्त काळात कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात धान्य साठवण्याच्या विविध पद्धतींचा उल्लेख आहे. याकाळात कणगीसारखी मोठी मातीची भांडी वापरली जात असत. ही भांडी हवेशीर आणि दमटपणापासून संरक्षित असत. या काळात घरगुती साठवणुकीसाठी लहान कणग्यांचा वापरही अधिक प्रमाणात होत असे.

              मध्ययुगीन काळात घरगुती आणि गावपातळीवर धान्य साठवण्यासाठी कणगीसारख्या मातीच्या भांड्यांचा मोठा उपयोग होत असे. काही ठिकाणी बांबूच्या चौकटींना शेणमातीचे मिश्रण लावून मोठ्या ‘कणगी’ सारख्या वस्तू  तयार केल्या जात असत. यामध्ये विशेषतः तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यांची दीर्घकालीन साठवणूक होत असे. मराठा आणि पेशवे काळात शेतकऱ्यांसाठी धान्य साठवणुकीच्या पारंपरिक पद्धती प्रचलित होत्या. मोठ्या कोठारांमध्ये आणि घरगुती कणग्यांमध्ये धान्य साठवले जात असे. या काळात कणगी बांधताना बाहेरून गेरू लावण्याचीही प्रथा होती, ज्यामुळे ती अधिक टिकाऊ होत असे.      

                    ब्रिटिशकालीन भारतात मोठ्या प्रमाणावर धान्य साठवण्यासाठी ब्रिटिश सरकारने आधुनिक गोदामे आणि लोखंडी संरचना आणल्या, पण ग्रामीण भागात कणगीचा वापर सुरूच राहिला. काही ठिकाणी मातीऐवजी लाकडाच्या कणग्या वापरण्यास सुरुवात झाली. धान्य टिकवण्यासाठी कणगीत निंबाची व इतर वनस्पतीची पाने यांचा उपयोग होऊ लागला. स्वातंत्र्योत्तर भारत आणि आधुनिक काळात आधुनिक गोदामे उपलब्ध झाल्यानंतरही ग्रामीण भागात कणगीचा वापर होत असे. मात्र या काळात काही ठिकाणी प्लास्टिक किंवा सिमेंटपासून तयार केलेल्या कणग्या वापरण्यात येऊ लागल्या. 

                काळानुरूप महाराष्ट्रातही अशाप्रकारे धान्य साठवण्याच्या विविध साधन सामग्रींचा वापर केला जात होता.  याकाळात महाराष्ट्रात विशेषतः कणगी हेच पारंपरिक पद्धतीने धान्य साठवण्याचे प्रमुख साधन म्हणून अधिक प्रमाणात वापरले जात असे. याकाळात महाराष्टात ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ इ. पिकांचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जात असे. कृषी पणन व विपणनाची व्यवस्था त्याकाळी प्रभावी नसल्याने ही सर्व धान्य घरातच साठवली जात असत. यासाठी कणगी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असत. कणगीमधील धान्य बराच काळ सुरक्षितपणे टिकत असल्यामुळे अस्मानी संकटात ते उपयोगी ठरत असे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात देखील महाराष्ट्रात पारंपरिक शेती केली जात होती. साखर कारखाने, औद्योगिकीकरण, सिंचन प्रकल्प यामुळे शेती व्यावसायला काही प्रमाणात चालना मिळू लागली होती. मात्र याकाळातही कणगीचा वापर बऱ्याच प्रमाणात केला जात होता. यानंतरच्या काळात मात्र कणगीचा वापर हळूहळू कमी होत गेला. 

               साधारणपणे हरितक्रांती नंतरच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषीक्षेत्राशी संबंधित विविध शासकीय धोरणे आणि विविध जलसिंचन प्रकल्प यामुळे शेती व्यवस्थापनात कमालीचे बदल झाले. यांत्रिक साधने, अत्याधुनिक अवजारे, संकरीत बियाणे, आधुनिक पिक व पाणी पद्धती यामुळे पारंपरिक शेती हळूहळू कमी होत गेली. नगदी पिकांचे प्रमाण व संख्याही वाढत गेली. बाजार समित्यांची निर्मिती झाल्यामुळे धान्य साठवून ठेवण्यापेक्षा विकण्याचं प्रमाण वाढलं. अन्नधान्यांच्या आयात - निर्यातीमुळे धान्याची उपलब्धता वाढली गेली. बाजारात सर्व प्रकारचे धान्य मिळू लागल्याने शेतकऱ्यांचा कल अन्नधान्य पिकविण्यापेक्षा नगदी पिकाकडेच अधिक वळला.  ज्वारी, बाजरी, गहू यांचे उत्पादन गरजेपुरते किंवा मर्यादित होऊ लागले. त्यामुळे ओसरीतील कणगीने तळ गाठला. 

                जसजसा काळ पुढे सरकू लागला तसतसा आधुनिकतेचा प्रवाह अधिकच जोम धरू लागला. नगदी पिकांमुळे तसेच सहज कर्ज उपलब्ध होऊ लागल्याने शेतकऱ्यांचा हाती पैसा खेळू लागला. कृषी क्षेत्रातील प्रगतीमुळे भौतिक साधनांची खरेदी आधुनिक जीवनशैलीचा अंगीकार होऊ लागला. याशिवाय शेती पूरक व्यवसाय, विविध क्षेत्रातील रोजगारांची उपलब्धता यामुळे पारंपरिक शेती व जीवनशैलीत कमालीचा बदल झाला. आहार, विहार, निवाऱ्याची साधनात आधुनिकता दिसू लागली. चौसोपी वाडे , धाब्याची घरे जाऊन त्याठिकाणी वाळू, गज, सिमेंटचे बंगले उभे राहू लागले. धान्य साठवण्याची नवनवी साधने आज बाजारात येऊ लागली आहेत. घराची खोली, आकार, रंग आणि चकचकितपणाला शोभेल अशी आधुनिक धान्य साठवण साधने आता घरात दिसू लागली आहेत. त्यातच घराच्या अघळ - पघळ वट्टा - ओसरीची जागा बंगल्याच्या चकचकित पोर्चने बळकावली आणि ओसरीतील दिमाखदार कणगी आता अडगळीत जाऊन पडली आहे. 

             एकेकाळी सर्वांना पोट भरून धान्य पुरवणारी कणगी आज स्वतःच  रिकामी होऊन अखेरच्या घटका मोजताना दिसत आहे. स्वतःच्या भक्कमतेबरोबरच मालकाच्या सक्षमतेचाही परिचय करून देणारी कणगी आता मात्र खिळखीळी झालेली दिसत आहे. घरा- ओसरीत भरलेली कणगी एकेकाळी श्रीमंतीचं आणि समृद्धीचं प्रतिक समजली जात असे. अडी- नडीच्या काळात पाव्हणे- रावळे, गरीब, भिक्षेकरू यांच्याप्रति धन्याच्या ठायीच्या औदार्य आणि सहकार्यवृत्तीला बळ देणारी ही कणगी स्वतःच आज आधारहीन झालेली दिसत आहे. कणगी लिपताना, तिच्यात धान्य भरताना, तिच्यातून धान्य काढताना तिच्याशी एक वेगळंच नातं जुळले जात असे. लहान मुलांना तर कणगीतून धान्य काढायला खूप मज्जा येत असे. तिच्यातील गारवा हवाहवासा वाटत असे. हा आनंद आज लोप पावत चालला आहे. 

              वर्षानुवर्षे सर्व प्रकारचे धान्य सुरक्षित, ठेऊन सर्वत्र समृद्धीचं भरलेपण बहाल करणाऱ्या कणगीचं एकेकाळी मानवी जीवनात महत्वपूर्ण स्थान होतं. काळ्या आईच्या कुशीतून मिळालेलं धन्याच्या कष्टाचं सोनं इमाने, इतबारे, चोख आणि सुरक्षित ठेवण्याचं अनमोल कार्य कारणारी कणगी ही निष्ठेची परिसिमा होती. म्हणूनच ग्रामीण तथा कृषी संस्कृतीला आपल्या कर्तव्याने समृद्धीचं दान देणारा हा पारंपरिक वारसा जपण्याचं कार्य व्हायला हवं. कणगीमुळेच तोडा, पाऊक, बेलसी, वळ इ. सामग्रीची एक साठवण संस्कृती निर्माण झाली. कणगी अस्तंगत झाली तर ही धान्य रक्षक संस्कृतीही लय पावेल. म्हणूनच हा ग्रामजीवनाला शतकानुशतके आधार देणारा कृषी संस्कृतीचा वारसा आणि सुख - समृद्धीचा साक्षीदार आपणास जपून ठेवायलाच हवा. बस्स एवढीच अपेक्षा ! 

✍️ डॉ. अशोक शिंदे, 

प्राध्यापक, मराठी विभाग,

मुधोजी कॉलेज, फलटण. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा