वावडी
काढणी एकदाची उरकलली की सगळेच जण खळ्याच्या कामाला लागतात. शेत आणि घरापासून जवळ किंवा योग्य अंतरावर थोडी उमाठाची व मुरूमाड जमीन असलेली जागा खळ्यासाठी निवडली जाते. खळ्याची ही जागा वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी असल्याचेही दिसून येते. आमच्या गावात तुकाईच्या माळावर अशी अनेक खळी होती. सर्व साधारणपणे खळ्यासाठी कमीत कमी पाच ते दहा गुंठे जागा गरजेची असते. ही सगळी जागा प्रारंभी स्वच्छ व सपाट केली जाते. प्रत्यक्ष खळ्यासाठी यातील मध्यभागाची आठ - दहा हात त्रिज्या असलेल्या गोल आकाराची जागा वापरली जाते. उरलेल्या मोकळ्या जागेत ज्वारीच्या सूड्या, गव्हाचे भारे आणि करडी व हरभऱ्याचे पेटे लावले जातात. प्रत्यक्ष खळ्याच्या मध्यभागी एक लाकडी डांब म्हणजेच तिवडा रोवला जातो. मग ही गोलाकार जागा पाण्याने भिजवली जात असे. अशावेळी चिखलात नाचायला लहान मुलांना लई मज्जा वाटायची. नंतर तिवड्याला एक जाड कासरा बांधून त्याला बैलांची पाथ जुंपून त्यांना गोल गोल फिरवून भिजवलेले खळे खुरवतले जायचे. यामुळे खळ्याची जमीन एकजीव व घट्ट बनत असे. असे खळे शेणाने सारवले की मग ते खुडणी - मोडणीसाठी सज्ज व्हायचे.
खळ्याचं काम चालू असतानाच रानात काढून पडलेलं गुड बैलगाडीतून खळ्यावर आणून त्याच्या सूड्या लावल्या जायच्या. एकदा खळं वाळलं की मग खुडणीला सुरुवात व्हायची. एव्हाना उन्हात बरेच दिवस वाळलेली कणसं मोडून वा खुडून खळ्यात टाकली जायची. या कामात अधूनमधून लहानग्यांची लुडबुड ठरलेलीच असायची. गुडाची कणसं एकदा खुडून झाली की मग उरलेला कडबा गंजीसाठी बाजूला टाकला जायचा. खळ्यातल्या कणसांची मग मळणी सुरु व्हायची. मळणी करताना खळ्यातील कणसं बाजूला जाऊ नयेत म्हणून कणसांच्या कडेने कडब्याच्या पेंढ्यांची कडणी लावली जायची. मळणीवेळी पून्हा बैलांची पाथ जुंपून त्यांना खळ्यात फिरवले जायचे. या बैलांच्या मागे चालायला लहान मुलांना खूप मज्जा येत असे. कधी कधी चालणाऱ्या बैलाचं पडणारं शेण वरचेवर झेलून बाहेर टाकण्याची कामं ही मंडळी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि काटेकोरपणे करत असत. खळ्यात कणसाचं मदन होईपर्यंत ही मळणी चालत असे. नंतर मग उफणनीला सुरुवात व्हायची. या उफणणीसाठी खळ्यात मग एक वावडी ठेवली जायची.
तीन पायावर उभा असलेल्या या वावडीचा वरचा भाग चांगल्या दणकट जाड फळीचा असतो. एकावेळी एकालाच उभा राहून धान्य उफाणता येईल अशा आकाराची ही फळी असते. साधारणपणे चार पाच फूट उंचीची ही वावडी सुताराकडून करून घेतली जायची. वावडीसाठी चांगल्या लाकडाचा वापर केला जात असे. त्यामुळे अशी वावडी पुढे कित्येक वर्ष वापरली जायची. तीन पायामुळे ही वावडी खळ्याच्या उंच सखल जागेवर अगदी सुस्थीर उभी राहायची. काही भागात चार पायाची वावडीही असायची. या वावडीवर उभा राहून धान्य उफणण्याचे काम अगदी सोपे होत असे. मळणीतून मळलेल्या मदनातून सार आणि असार बाजूला करण्याचे महत्त्वाचे कार्य करणारी ही वावडी सुगीच्या सर्व प्रक्रियांतील एक उपयुक्त साधन होते. सुगीमध्ये सर्वात महत्त्वाचं काम यावावडीचंच असायचं. नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याच्या काळात वावडी हे धान्य उफणण्यासाठी वापरले जाणारे प्रमुख आणि उपयुक्त असे साधन होते. प्राचीन काळापासून सुगी करताना धान्य उफणण्याच्या कामात वापरले जाणारे एक पारंपरिक साधन म्हणून कृषी संस्कृतीत वावडीला खूप महत्वाचे स्थान असलेले दिसते.
भारतीय कृषी परंपरेत वावडी या साधनाचा वापर व प्रारंभ प्राचीन काळात झाला असल्याचे दिसते. वैदिक काळातील साहित्यात शेतीविषयक विविध साधनांचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये विशेषतः ‘शूळ’ आणि ‘सुप’ या साधनांचा उपयोग धान्य वेगळे करण्यासाठी केला जात असे. वाऱ्याच्या मदतीने धान्य आणि भुसा वेगळे करण्यासाठी लाकडी किंवा बांबूची हलकी साधने याकाळात वापरण्यात येत असत. त्या संदर्भात ‘वावडी’ ही संकल्पना याच काळात अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. महाजनपद आणि मौर्यकाळात वावडी चे काही संदर्भ आढळतात. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मळणी, धान्य साठवणूक, आणि शुद्धीकरणाच्या पद्धतींचा उल्लेख केला आहे. अशा प्रक्रियांसाठी पारंपरिक साधनांचा उपयोग होत असावा. त्यामुळे या काळात ‘वावडी’ सारख्या साधनांचा वापर वाऱ्याच्या सहाय्याने भुसा वेगळा करण्यासाठी होत असावा असे वाटते.
मध्ययुगीन काळात शेतीमध्ये पारंपरिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला होता. या काळात धान्य उफणून त्यातून भुसा वेगळा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांमध्ये सुधारणा झालेली दिसते. याच काळात काही भागांत बांबूची किंवा लाकडाची ‘वावडी’ हा अधिक प्रगत प्रकार विकसित झालेला होता. पुढे ब्रिटिश कालखंडात शेतीमध्ये काही प्रमाणात आधुनिक साधनांचा प्रवेश झाला, पण याकाळात पारंपरिक साधनेही मोठ्या प्रमाणात वापरली जात होती. स्वातंत्र्योत्तर काळातही भारतातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बैलांच्या साहाय्याने मळणी केली जात आणि उफणनीसाठी ‘वावडी’ चा वापर सुरू होता.
महाराष्ट्रात देखील प्राचीन काळापासून धान्य उफणनीसाठी ‘वावडी’ चा केला जात असे. विशेषत: ज्वारी, बाजरी, गहू या भरडधान्य पिकांसाठी येथे वावडी अधिक प्रमाणात वापरली जात असे. ज्वारी हे महाराष्ट्राचे मुख्य पिक मानले जाते. त्यामुळे ज्वारीच्या सुगीवेळी तर खळ्यावर सर्वत्र ही वावडी उभी असलेली दिसायची. मळणी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या वावडीचं काम सुरु होते. मळणीवेळी बैलांच्या खुरांनी खळ्यात कणसं तुडवली जातात. त्यामुळे कणसातील दाणे बोंडातून वेगळे होतात. हे होत असतानाच कणसाच्या इतर भागाचाही चुरा होतो. खळ्यात मळणीतून तयार झालेल्या या मिश्रणाला मदन असे म्हटले जाते. अशाच प्रकारची मळणी बहुतेक सर्वच पिकांची होत असे. खळ्यात मळणीचे मदन झाले की मग उफणनीला सुरुवात होते.
उफणनी म्हणजे खळ्यातील मदनातून धान्य आणि इतर भुसा वेगवेगळे करणे. उफणनीसाठी खळ्यातील मदान गोळा करून त्याचा एका बाजूला मोठा ढीग लावला जातो. मग स्वच्छ केलेल्या खळ्यात वावडी उभी केली जाते. उफणनीसाठी किमान तीन जनांची गरज असते. एक जण उफाणणारा, जो वावडीवर उभा राहून उफणनी करतो. दुसरा पाटी देणारा, जो मदनाची पाटी भरून पहिल्याच्या हातात देतो. आणि तिसरा हातनीवाला, जो उफणनताना खाली पडलेल्या धान्याबरोबर आलेल्या कणसाच्या काड्या किंवा बोंडे बाजूला काढण्याचं काम करतो. खळ्यातील मदनाचे कमी अधिक प्रमाण लक्षात घेऊन यामध्ये आणखीही काही जणांची मदत घेतली जाते.
उफणनीचं हे काम कष्टाचं, कोशल्याचं आणि वेळखाऊपणाचं असते. खालच्याने पाटी भरून दिल्यावर वावडी वरचा माणूस ती पाटी वाऱ्याच्या दिशेला धरतो आणि हळूहळू हलक्या हाताने ती पाटी विशिष्टरितीने हलवतो. त्यामुळे पाटीतील मदान हळूहळू खाली येते. हे खाली येत असतानाच भुसा वा कूस, बोंडं वाऱ्यामुळे विरुद्ध बाजूला वाहून जातात. याचवेळी दाणे व जे वाऱ्याने वाहून जाऊ शकले नाही ते सर्व खाली पडते. याचवेळी हातानीवाला दाण्याबरोबर खाली पडणारे गबाळ आपल्या हातातील हातनीने अगदी हलक्या हाताने बाजूला करतो. ही हातनी आघाड्याच्या काड्यांपासून तयार केली जात असे. आघाड्याच्या तीन चार झुडपाच्या काड्या बांबूच्या कामठीने पसरट बांधून हातनी तयार केली जात असे. उफणनीच्या वेळी हातनी चालवणे हे कौशल्याचे काम असायचे. उफणनीचे असे काम चालू असतानाच खाली मोत्या प्रमाणे दाण्यांची रास रचली जात लागते.
या उफणनीचे काम तसे जोखमीचे असते. पाऊस, वादळ अशा अस्मानी संकटाची काळजी असायची. त्यामुळे अखंडपणे हे काम चालू असायचं. उफणनी कधी एका दिवसात आटपायची तर कधी कधी दोन - तीन दिवसही चालायची. कारण हे काम पूर्णतः वाऱ्यावर अवलंबून असे. या काळात शेतं - शिवारं उघडी, मोकळी झालेली असतात. शिवाय उन्हाचा जोर वाढत असल्याने त्याचा हवेचा दाबावर परिणाम होऊन वाऱ्याची दिशा बदलून गतीही वाढलेली असते. त्यामुळे या वातावरणाचा उफनणीसाठी नेमका फायदा करून घेतला जात असे. मात्र हा वारा कधी येईल याचा भरोसा नसायचा. त्यामुळे कधी कधी अनेक दिवस हे उफणनीचे काम चालत असे. वारा जमिनीपेक्षा उंचावर अधिक जाणवतो म्हणून या कामी वावडी खूप उपयोगी पडत असे. शिवाय वावडीमुळे या कामाचा कंटाळाही येत नसे.
उफणनीचं हे कामं कितीही मेहनतीचं असलं तरी उफणनीनंतर खळ्यात धान्याची रास पाहून कुणब्याचा आनंदाला मात्र पारावर राहत नसे. राशीची विधिवत पूजा करून मग धान्य पोत्यात भरले जायचे. नंतर बैलगाडीतून शेतातले हे धन घरी नेले जात असे. उफणन्याचं काम चोखपणे बजावणारी वावडीही मग व्यवस्थित ठेवली जायची. पुढच्या वर्षी खळ्याच्या वेळी ही वावडी पुन्हा कामासाठी सज्ज असायची. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालू असल्याचे दिसते. मात्र अलीकडच्या काही वर्षात सुगीची प्रक्रियाच बदलून गेली असल्याचे दिसते.
स्वातंत्रोत्तर काळात विविध जलसिंचन प्रकल्प आणि शेतीशी संबंधित मूलभूत संशोधन यामुळे कृषीक्षेत्रात अनेक अमूलाग्र बदल घडून येत आहेत. विशेषतः हरितक्रांती नंतर अनेक आधुनिक तंत्रज्ञानयुक्त यांत्रिक साधने विकसित झाली आहेत. त्यामुळे पिकाच्या पेरणीपासून ते धान्य कणगीत पडेपर्यँतच्या सर्व प्रक्रिया आज अध्ययावत यंत्राद्वारे पूर्ण केल्या जात आहेत. त्यामुळे शेतातील कामाची व सुगीच्या काळात उपयोगात येणारी सर्व साधने हळूहळू बाजूला पडलेली दिसतात. वावडी हे साधनही आज असंच कुठेतरी अडगळीत पडलेलं दिसत आहे.
आज पेरणी यंत्रापासून ते मळणी यंत्रापर्यंत सर्व आधुनिक यंत्रे सर्वत्र उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे काढणी, कापणी, खुडणी, मळणी आणि उफाणनी या सुगीच्या सर्व क्रिया आता एकाच वेळी यंत्राच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत. परिपूर्ण पक्वता, शुद्धता आणि निर्मळता या बाबी यंत्राने साधण्यास मर्यादा येते. त्यामुळे श्रम, वेळ, पैसा यांची बचत आणि अस्मानी संकटांपासून काहीशी सुटका होत असली तरी नैसर्गिकपणे केली जाणारी सुगीची ही कामे यांत्रिकतेत तितकीशी योग्य तथा व्यवस्थितपणे साधली जात नाहीत. एक साधन वापरातून कमी झाले की त्यामागे त्याच्याशी संबंधित संस्कृतीच नाहीशी होताना दिसते. वावडी ही देखील मानवी सामाजिक आणि सांस्कृतिक समृद्धीचे एक अविभाज्य अंग होती.
वावडीचं कामं केवळ खळ्यातील धान्य उफणनी करण्याचं असलं तरी सुगी संस्कृतीशी तिचे घट्ट नाते जोडले गेलेले होते. त्याकाळी सुगीचं प्रत्येक काम एकमेकांशी परस्पर संबंधाने जोडले गेलेले असायचे. काढणीच्या वेळी गायली जाणारी भलरी व घातली जाणारी इर्जिक आता होताना दिसत नाही. भलरी हे लोकगीताचं तर इर्जिक हे लोकजीवनातील सहकार्याचं अनमोल संचितचं होतं. शिवाराच्या कोपऱ्यात ठेवली जाणारी सीतामाई केवळ श्रद्धा नव्हती तर आपल्या ओटीत टाकलेले दान कित्येक पटीनं भरभरून देणाऱ्या काळ्या माईविषयी व्यक्त केलेली ती कृतज्ञता असायची. सर्वा वेचताना होणाऱ्या प्रापंचिक गप्पा, काढणी, मळणी, खुडणीवेळी केली जाणारी सावड, साधनाची केली जाणारी देवाण घेवाण यातून सामाजिक सौख्य आणि सोहार्द वाढीस लागत असे. प्रत्यक्ष खळ्यात जमा झालेल्या राशींतून एखाद्याच्या झोळीत ओतलेल्या शेर - आठव्यानं दातृत्त्व वृद्धिंगत व्हायचं. सुगीच्या वेळी खोती किंवा वाट्यानं काम करणाऱ्यांना खळ्यावरच त्यांचा हिस्सा दिला जायचा. अशा कष्ट आणि मेहनतीतून मिळालेल्या फळाचा आनंद किती स्वादिष्ट असतो याचं दर्शन घडायचं. अशा सुगीशी संबंधित कामातील भावभावनांचा साक्षीदार असायची ती वावडी.
शिवारातील धन आणि कष्टाचं फळ यातून मिळणाऱ्या समुद्धीत खळ्यावर उभा असलेल्या वावडीचं मोठं योगदान असायचं. आज यांत्रिकीकरणामुळे वावडीचं काम संपलं आहे. वावडी तर दिसेनाशी झालीच आहे; परंतु त्याबरोबर बैलगाडीने वाहताना गुडाचा रचला जाणारा हेल, खळे, खळ्याभोवतीच्या सूड्या, भारे, पेटे, मदान, हातनी, रास, कडबा आणि गंज या गोष्टीही आज यांत्रिकीकरणाच्या अंधारात गेल्या आहेत. त्यांच्या बरोबर त्यांची ओळख, अस्तित्त्व व संस्कृतीही अंधारली आहे.
आज अजूनही काही भागात पारंपरिक नैसर्गिक सुगी होत असेल. मात्र आधुनिकतेच्या वेगात ही पारंपरिक सुगीसंस्कृती विनाशाच्या मार्गांवर आहे हे मात्र खरे. त्यामुळे एकेकाळी खळ्यात दिमाखात उभा राहून आपल्या पुढ्यात सौख्याची रास पाहणारी ही वावडी आज अडगळीत आडवी होऊन पडलेली आहे. ज्या वावडीमुळे मोत्यासारखे तेजस्वी व स्वच्छ दाणे मिळाले ती मात्र आज अंधाऱ्या जागेत अखेरच्या घटका मोजत आहे. मानवी जीवनातील समुद्धीचा हा साक्षीदार पुन्हा केंव्हा एकदा दिमाखात उभा राहील हे काळंच ठरविल ; पण प्रयत्न करूयात या वावडीचं कार्य आणि अस्तित्त्व जपण्याचं !
✍️ डॉ. अशोक शिंदे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा