शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

कावड - अडगळीतील समृद्धी लेख- १६ कावड

 कावड 

            त्यावर्षी आम्ही नुकतंच चव्हाणवस्ती वर राहायला आलो होतो. तीन- चार घरांची ती वस्ती. तिथे एका छोट्याशा झोपडीत आम्ही राहायला सुरवात केली. दुसऱ्या दिवशी मी सकाळी झोपेतून उठलो तेव्हा मला ‘करऽऽकरऽऽ’ ‘करऽऽकरऽऽ’ असा आवाज सुरैल आवाज ऐकू लागला. मी बाहेर येऊन आवाजाच्या दिशेने पाहिले तर मारती तात्या कावड घेऊन येत असलेले मला दिसले. जसे जसे तात्या जवळ आले तसतसा ‘करऽऽकरऽऽ’ आवाज आणखीच गाजू लागला. तात्या त्या आवाजाच्या नादात एका लयीत पावले टाकत चालत येत होते. तात्याच्या उजव्या खांद्यावरची कावडही एका विशिष्ट लयीत हेलकावे घेत होती. या हेलकाव्यामुळेच तो ‘करऽऽकरऽऽ’ असा मधुर आवाज येत होता.  तात्या कावड घेऊन थेट रांजणाजवळ गेले. तेथे त्यांनी आपली कावड खाली टेकवली. दोन डब्याला अडकवलेली लोखंडी हुके काढली. काठी भिंतीला उभी केली आणि एकेक डबा रांजणात ओतून ते पुन्हा कावड घेऊन पाणी आणायला निघाले. तात्यांची ही रोजनिशीच होती. सकाळी उठणे, कावड उचलणे, विहिरीवर जाणे आणि अंघोळ करून कावड भरून आणणे. 

           या वस्तीवरील सर्व घरी पाणी भरण्याची अशीच पद्धत होती. वस्तीजवळच एक ओढा होता. त्याला पावसाळ्यात पाणी यायचे. या काळात घरातील कपडे लत्ते आणि इतर साहित्य धुण्यासाठी या ओढ्याचे पाणी असायचे. शिवाय वस्तीजवळच शेतं असल्यामुळे तिथपर्यंत दंडाला विहिरीचे यायचे. मात्र स्वयंपाक, भांडी आणि पिण्यासाठी लागणारे पाणी विहिरीवरूनच आणावे लागत होते. उन्हाळ्यात ओढा आटल्यावर तर घर खर्चासाठी लागणारं सर्वच पाणी विहिरीवरूनच  आणावे लागत असे. वस्तीपासून सुमारे अर्धा पाऊण किलोमीटर अंतरावर भोपत्यांच्या मळ्यात ही विहीर होती. तात्या तेथून कावडीने रोज सकाळी सकाळी पाणी आणत असत. तात्याप्रमाणेच या वस्तीवरील शिवाजी नाना, दत्तूभाऊ आणि अंबादास दादा हे देखील सकाळीच कावडीने पाणी भरायचे. 

            विहीर बरीच लांब असल्यामुळे या विहिरीवर शक्यतो पाणी भरण्यासाठी स्त्रीया येत नसत. त्यामुळे या विहिरीवर सकाळी कावड्यांचीच गर्दी असायची. जवळच्या निंबाळकर वस्तीवरील अनेक बापेलोकही या विहिरीवर आपापल्या कावडी घेऊन येत असत. एका दिवसासाठी किमान रांजणभर पाणी लागायचे. त्यामुळे किमान दोन तीन कावडी तरी रोज आणाव्या लागत असत. त्याकाळी दूरवरून पाणी आणण्यासाठी प्रत्येक घरी अशी  कावड असायचीच. प्रत्येक घरच्या ओसरीला दोन खुंट्यांवर अडकवलेली किंवा भिंतीच्या कोपऱ्यात उभी केलेली कावडीची काठी हमखास दिसायची. आम्ही शाळेत जाताना अनेक कावडी आम्हाला भेटायच्या. विविध प्रकारच्या कावडी आणि त्या घेऊन चालण्याच्या वेगवेगळ्या चाली आम्ही रोज पाहायचो. प्रत्येक जण आपल्या झोकात आणि तालात दंग होऊन कावड घेऊन चालायचे. 

            कोणी एका खांद्यावर सरळ काटकोनात काठी ठेऊन एक हाताने ती पकडत, तर कोणी एका खांद्यावरच पण काहीशी तिरकी आणि एका हात वरून टाकत  काठी ठेवत; तर कोण कोण दोन्ही खांद्यावर काठी ठेऊन दोन्ही हात काठीवर टाकत असत. काही जण काठीऐवजी गजांना पकडत असत. तसेच काही जण तर एकदा कावड खांद्यावर ठेवली की हात न लावता थेट घरापर्यंत येत असत. काही जण काहीसे वाकत, झुकत असत; तर काही एकदम ताठ चालत. यापैकी मला मारती तात्याची कावड घेऊन चालायची पद्धत खूप आवडायची. मी रोज सकाळी अंधोळीसाठी तात्याबरोबर विहिरीवर जायचो. तात्यासुद्धा विहिरीवरच अंघोळ करायचे. तात्या कावड घेऊनच विहिरीवर निघायचे. त्यामुळे तात्यांची कावड मी रोज पाहायचो. मोटारीच्या पाईपला थेट डबा लावून त्यात ते पाणी भरायचे मग विशिष्ट अंगावर दोन डबे ठेवायचे कवडीची काठी खांद्यावर घेऊन लोखंडी हुक डब्याच्या कडीत गुंतवून तात्या कावड उचलायचे. नंतर तात्या डाव्या खांद्यावर कावड ठेवून दोन्ही हातानी काठी पकडत आणि थोडेसे तिरकस होऊन चालत असत. त्यांच्या कावडीचा आवाजही जोरातच येत असे. 

           तात्यांनी ही कावड खास पाटसच्या रामानाना करून घेतलेली होती. रामनाना कावड करण्यात माहीर होते. त्यांनी तात्याच्या कावडीसाठी साधारणतः सहा - साडे सहा फूट लांबीची वेताची (बांबू) काठी वापरली होती. नानांनी ही काठी सुरवातीला बरोबर निम्मी निम्मी फाकळवली. पुन्हा ती आहे तशी जोडून दोन्ही शेंड्यांना रबरी वाद्या घट्ट आवळल्या. या आधी नानानी छोट्या कामठीचे दोन तुकडे काठीच्या चिमटीत रबरीवादीजवळ सरकवून दाबून बसवले होते. या योजनेमुळेच तात्याची कावड इतरांपेक्षा अधिक जोरानं आवाज करत असे. नंतर नानांनी या काठीच्या दोन्ही बाजूंनी अर्धा फूट आत एकेक भोक पाडून त्यामध्ये लोखंडी कडी बसवलेली होती. या कडीच्या दोन्ही दांड्या टोकदार असल्याने त्या काठीच्या भोकातून वर घेऊन त्या पुन्हा काठीवर गोलाकार पिळवून घट्ट बसवल्या होत्या. नंतर या कडीमध्ये दोन्ही बाजूंना एक लोखंडी गज अडकवून तो कडीतून निसटणार नाही अशा प्रकारे वळवून बसवला होता. या दोन्ही बाजूंच्या गजांची खालची टोके वरच्या बाजूंनी वळवलेली होती. हे गज साधारण दीड दोन फूट लांब होते. अशा प्रकारे नानांनी ही कावडीची काठी तयार केलेली होती. 

           नंतर नानांनी कावडीसाठी दोन डब्बे तयार केले होते. यासाठी त्यांनी तेलाचे मोकळे झालेले डबे वापरले होते. डब्याच्या तोंडाला आतल्या बाजूने बरोबर मध्यावर मनगटाएवढ्या जाडीचा बांबूचा तुकडा बाहेरच्या बाजूने खिळे ठोकून बसवला होता. या बांबूला मध्यावर नानांनी एक लोखंडी कडी आवळून बसवली होती. काठीच्या दोन्ही बाजूचे गज अडकवण्यासाठी ही योजना नानांनी केलेली असावी. अशा प्रकारे मारती तात्याची कावड तयार केली होती. तात्यांची कावड पाहून आम्ही सुद्धा घरी अशीही कावड रामनानांकडून करून घेतली होती. त्यामुळे सकाळी सकाळी मी देखील तात्यांबरोबर कावड घेऊन पाणी आणायला जात असे. दूरवरून पाणी आणण्यासाठी कावड हेच त्यावेळी मुख्य साधन असायचे. कावडीने एकाचवेळी तीस पस्तीस लिटर पाणी आणले जायचे. घरातील पुरुष मंडळी हे काम करत असत. कावडीसाठी काठी आणि पाणी भरण्यासाठी दोन समान आकाराची भांडी वापरली जात असत. कोणी कोणी कावडीसाठी बादल्या किंवा इतर भांडी देखील वापरत असत. 

            आमच्या वस्तीवर दत्तूभाऊंची कावड बादल्यांची, तर बाकी सर्वांच्याच कावडी डब्यांच्या होत्या. काठीस लोखंडी गजाऐवजी सुती दोर बांधून त्यामध्ये माठ, घागर किंवा हंडा ठेऊनही काही भागात कावडीने पाणी आणले जात असे. ग्रामीण भागात शेती, पिण्याचे पाणी व दैनंदिन वापरासाठी विहिरी, ओढे, नदी, तळी यातून पाणी आणावे लागत असे. घडे किंवा माठ भरून पाणी वाहून नेणे हे त्यावेळी कष्टाचे काम होते. हे काम स्त्री आणि पुरुष दोघेही करत असत. मात्र एकाच वेळी अधिक पाणी आणण्याचा पर्याय म्हणून या काळात दोन्ही खांद्यांवर वजन समानरित्या पेलण्याची पद्धत विकसित झाली असावी. ही व्यवस्था म्हणजेच ‘कावड’ होय. कावड हे ग्रामीण संस्कृतीतील घरामध्ये पाणी भरण्याचे महत्त्वाचे साधन आहे. भारतीय परंपरेत कावडीस मोलाचे स्थान असलेले पहावयास मिळते. 

          प्राचीन काळात ग्रामीण भारतात पाणी वाहनासाठी बांबू किंवा लाकडाच्या कावडींचा वापर केला जात असे. या काळात धार्मिक वा पवित्र कार्यासाठी  कावडीचा वापर केला जात असे. विशेषत: शंकरासाठी जलाभिषेक करण्यासाठी कावडीने पाणी आणले जात असे. म्हणूनच ‘कावड यात्रा’ ही संकल्पना शैव भक्तांतून उदयास आली असे म्हटले जाते. आजही अनेक भक्तलोक पवित्र गंगेचे पाणी घेऊन ते शिवाला अर्पण करतात.

मध्ययुगीन काळात धार्मिक कार्याबरोबरच इतर कार्यासाठीही पाणी भरण्यासाठी कावड वापरली जाऊ लागली. यापूर्वी गावात पखालीने पाणी आणले जात असे. रेड्याच्या पाठीवर कातडी पिशवी म्हणजेच पखाल ठेऊन हे पाणी गावात घरोघरी वाटले जात असे.

             प्रारंभीच्या काळात लांब बांबू किंवा लाकडी दांड्याच्या दोन्ही टोकांना दोऱ्या बांधून त्यावर माठ, घडे किंवा रांजन ठेऊन कावडी वापरल्या जात असत. कावडीचा दांडा खांद्यावर ठेवून संतुलन साधत एकाच वेळी दोन भांडी वाहून नेता येतात. या प्रक्रियेत खांद्यावर दाब समान राहतो, त्यामुळे वजनाचा त्रास ही कमी होतो. म्हणूनच ही कवडीची योजना या काळात अस्तित्वात आली असावी. पुढील काळात विहिरीतून किंवा ओढ्यातून रांजणात पाणी आणण्यासाठी कावड वापरली जाऊ लागली. या काळात लाकडाच्या ऐवजी बांबूचा वापर केला गेला. बांबू वापरल्याने वजन हलके झाले. ब्रिटिश काळात गावात पाणी भरण्यासाठी कावडीचा वापर अधिक वाढला. या काळात कावडीने पाणी वाटप करण्याला व्यावसायिक रूप प्राप्त झाले. याच काळात घरोघरी उदर निर्वाह करण्यासाठी कावडीने पाणी भरून दिले जात असे. अशा उदरनिर्वाह करणाऱ्यांना ‘पाणक्या’ किंवा ‘पाणेरी’ असे म्हटले जायचे. मोठ्या जमीनदार किंवा बागाईतदाराच्या घरी पाणी भरण्यासाठी हे लोक मजुरीने किंवा विशिष्ट वस्तूच्या मोबदल्यात कावडीने पाणी भरत असत. 

             पुढे स्वातंत्र्योत्तर काळात विहिरीवर मोटरपंप, पाईपलाइन तसेच शासकीय पाणी पुरवठा योजना, नळयोजना सुरू झाल्या. घरोघरी नळाद्वारे पाणी येऊ लागले. थेट स्वयपाक घरात चोवीस तास पाण्याची उपलब्धता झाली. विहिरीतील मोटारीचा पाईप आता थेट पिकाच्या वाफ्यात किंवा सरीत पोहचला आहे. त्यामुळे विहिरीवरून पाणी भरण्यास अडचणी येत आहेत. गावात आड आणि बारवा दिसतच नाहीत आणि दिसल्याच  तर आटलेल्या अवस्थेत दिसतात. थेट हवे तेथे पाणी उपलब्ध झाले असल्याने आज कावडीला कामच राहिले नाही. आज ग्रामीण भागात अगदी तुरळक ठिकाणचा अपवाद वगळता कावडीचा वापर होताना दिसत नाही. कावडीची काठी आणि डब्बे आज कुठेतरी अडगळीत पडलेले दिसतात. काही ठिकाणी तर तिचे अवशेष देखील पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे लोकव्यवहारातून आज ही कावड हळूहळू हद्दपार होण्याच्या मार्गांवर आहे.

               कावड हे धार्मिक, सामाजिक व कौटुंबिक संस्कृती समृद्धीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. विशेषत; धार्मिक परंपरेत शिवभक्तांची‘कावड यात्रा’ अजूनही सुरु आहे. कावडीने केवळ पाणी वाहिले जात नाही तर विविध वस्तू पदार्थही कावडीच्या साहाय्याने वाहिले जात असत. रामायणात तर श्रावण बाळ आपल्या माता पित्यांना कावडीत बसवून तीर्थयात्रेला घेऊन चालायचा उल्लेख आहे. कावडीने पाणी आणणे हे केवळ कष्टाचे काम नसायचे, तर ते एक कौशल्याचे काम असायचे. ओझे घेऊन स्वतःचा तोल सांभाळत कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त पाणी वाहण्याचे कावड हे खूप महत्वाचे साधन होते. यामुळे श्रमसंस्कृतीसह शारीरिक सबलता व सक्षमता अंगी निर्माण होत असे. 

          कावडीने पाणी वाहणे म्हणजे एक प्रकारचा व्यायाम असायचा. त्याकाळी कावडीने दूरवरून पाणी वाहण्याची तरुणांमध्ये चुरस लागायची. मित्र, सवंगडी एकत्रित अगदी आनंदाने हे काम करत असत. कावडीद्वारे घरातील पाणी वाहण्याचे काम पुरुष करत असल्याने स्त्रियांचे पाणी भरण्याचे कष्टही कमी होत असत. त्यामुळे कौटुंबिक परस्पर प्रेमाची भावना निर्माण होऊन कार्यविभागणीचे तत्त्व पाळले जात असे. म्हणूनच कावड हे श्रम, बल, प्रेम आणि कौशल्याचं प्रतिक मानली जात असे. शेजारी किंवा नातेवाईकांच्या लग्न कार्यात किंवा इतर कार्यक्रमात गाव, वस्तीवरील अनेक जण कावडीने पाणी वाहून संबंधित व्यक्तीला एक प्रकारे आधार देत असत. कधी कधी अडचणीच्या काळात कावडीची देवाण घेवाण देखील होत असे. यातून सामाजिक सहकार्यवृत्ती व स्नेह वाढीस लागत असे.

            पाणी पिण्यास देणे किंवा पाणी पाजणे हे भारतीय संस्कृतीत पवित्र आणि पुण्याचे काम मानले जाते. संत एकनाथांनीही काशीवरून कावडीने आणलेले गंगेचे पाणी तहानलेल्या गाढवास पाजून पुण्यप्राप्ती व भूतदयेचा संदेश दिलेला आहे. त्यामुळे कावडिच्या माध्यमातून विविध घटकांना पाणी देऊन लोक अशा प्रकारे पुण्य पदरी पाडून घेत असत. कावडीने हे कार्य तर साधले जायचेच. याशिवाय कावडीचे रूपही तसे सुंदर, देखणं आणि कलात्मक असल्याने घराच्या ओसरीत दोन खुंट्यांवर अडकवलेली ही कावड म्हणजे घराचं एक वैभवच असायचं. अशा प्रकारे लोकसंस्कृतीच्या धार्मिक व सामाजिक परंपरेचा वारसा असलेली ही कावड आज आपल्या अस्तित्वाच्या अखेरच्या घटका मोजत आहे. 

            एकेकाळचा ग्रामीण साधन संस्कृतीचा हा समृद्ध साक्षीदार आज कुठेतरी अडगळीत धुळीत खंगत पडलेला आहे. घरात पाणी आणून कुटुंबाला नवचैतन्य बहाल करणारा पुण्यप्रदान संस्कृतीचा हा वाहक आज स्वतःच आपल्या अस्तित्वासाठी अखेरच्या घटका मोजत आहे. ग्रामीण जीवन समृद्धीचा हा वैभवशाली साक्षीदार लोप पावल्यास काळ आपणास सदैव दोष देत राहील. आपल्या ग्रामीण संस्कृतीचं हे गतवैभव जपायचं असेल तर कावड केवळ साधनरुपानं नव्हे तर कार्यरुपानं टिकवायचा प्रयत्न व्हायला हवा.

✍️ डॉ. अशोक शिंदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा